जालना ः जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील काजळा फाटा ते सायगाव येथील रस्ता (रा.क्र. एन.एच. 528 एच टीडीआर 05 अंतर्गत) या मुख्य मार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे व अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्याचे काम दिलेल्या निकषांप्रमाणे होत नसल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बोबडे यांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
त्यांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि. 2 रोजी पासून आमरण उपोषण सुरू केले. या संदर्भात त्यांनी जिल्हाप्रशासनाला निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्यांनी संबंधित कंत्राटदार, व्यवस्थापक व अभियंत्यांनी तक्रारदारांना फोनवरून शिवीगाळ व धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याबाबत वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याचे काम निकृष्ट असूनही मोजमाप व देयके काढण्याचा प्रकार सुरू असल्याचेही त्यांचे म्हणने आहे.
रस्त्याचे कायम भिजत घोंगडे
काजळा ग्रामस्थांनी या रस्त्यासंदर्भात अनेकवेळा जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. सुमारे 9 ते 10 कोटी रुपये खर्चुन हा रस्ता झाला होता. मात्र, या रस्त्याला आता अवकळा आली आहे.