जालनाः भाजपा जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचे भूमीपूजन सोहळा आणि शेतकऱ्यांनी केलेल्या जाहीर सत्काराला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व व्यासपीठावर उपस्‍थित इतर मान्यवर.  (छायाः किरण खानापुरे, अनिल व्यवहारे )
जालना

Jalna industrial development : जालनाची ओळख ‘ट्रीपल एस’ म्हणून होईल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार; भाजपाच्या नूतन इमारतीचे थाटात भूमिपूजन

पुढारी वृत्तसेवा

जालना : जालना जिल्हा विकासाकडे अग्रेसर झाला आहे. जालन्यात स्‍टिल उद्योग, सीड उद्योगाची भरभराट झाली आहे. आता यात सिल्कची अधिकची भर पडली आहे. येत्या काळात जालन्याला ‘ट्रीपल एस’ म्हणून नवीन ओळख निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

शुक्रवार, दि. १४ रोजी एमआयडीसी फेज क्रमांक १ मधील भाजप जिल्हा कार्यालय इमारतीच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शेतकरी कर्जमाफी केल्याबद्दल त्यांचा शेतकऱ्यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळा आणि भूमिपूजनाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर माजी केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार बबनराव लोणीकर, भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष तथा आमदार नारायण कुचे, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, महापौर वंदना मगरे, घनश्याम गोयल आदींची उस्‍थिती होती.

पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आपल्या देशाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जात आहे. विकसित देशांच्या यादीत आपण चौथ्या क्रमांकावर आहोत. प्रधानमंत्री मोदींनी आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये अनुदान दिले आहे तर महाराष्ट्र सरकारने देखील त्यांच्यासोबत सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केला. नमो शेतकरी सन्मान योजना आणली गेली. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही केला. आणि तो तडीस नेत आहोत असे सागून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक झाल्याबरोबरच काँग्रेसने मोफत वीजेचा निर्णय मागे घेतला असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे केवळ आश्वासन दिले नाही, तर प्रत्यक्षात मोफत वीज आम्ही दिली आहे. जोपर्यंत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी महायुतीचं सरकार आहे, तो पर्यंत मोफत वीज देण्याचा आमचा संकल्प आहे. शेतकऱ्यांना १२ तास वीज मिळाली पाहिजे. दिवसा वीज देण्याचे प्रमाणा ७६ टक्‍के आहे. ते वाढवण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी आम्ही सौर कृषी वाहिनी योजना राबवली. ८ वरून १२ तासावर पोहचवू, असे ते यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहे. मराठवाडा भाग अवर्षग्रस्तभाग आहे. यासाठी वाहून जाणारे नद्यांचे पाणी मराठवाड्यात आणू. या पिढीने दुष्काळ पहिला आहे. पुढ्याच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल. स्वतःचे कार्यालयामुळे जनसेवेची कामे मोठ्या उमेदीने केली जातील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

५५ हजार कुटुंबांचे वीजबिल माफ

वीजबिलाची जुनी थकबाकी ५५ हजार होती. आपल्या सरकारने या ५५ हजार कुटुंबांचे वीजबिल माफ केले आहे. त्यांना नो ड्यूजचे प्रमाणपत्र आम्ही देऊ. विधानसभा निवडणुकीच्यावेळी कर्जमाफीची घोषणा केली होती. विरोधक कर्जमाफी करणार नाही असे बोलत होते. पण आपण कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर न ठेवता ५६ हजार कोटी रुपयांची कर्ज माफी दिली. असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

सध्या राज्यभरात लाडकी बहीण योजना चांगल्या प्रकारे सुरू आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, राज्यसरकाने लखपती दीदी करण्याचा निर्णय केला आहे. सध्या ५० लाख लखपती दीदी झाल्या आहेत. तो आकडा १ करोडपर्यंत नेण्याचा आमचा माणस आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT