जालना ः जानेवारी ते जुन 2025 अखेरपर्यंत 1028 क्षयरुग्ण उपचारावर आले. त्यापैकी 968 रुग्णांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली. या तपासणीत 20 क्षयरुग्णांना एचआयव्ही असल्याचे निदान झाले असून या रुग्णांना सीपीटी व एआरटी सुरु करण्यात आली आहे. जालना शहर महानगरपालिकेअंतर्गत एकुण 29 क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.गोपाल कुडलीकर यांनी दिली.
दरम्यान, क्षयरोगाचे वेळेत निदान होण्यासाठी वर्ष 2026-27 मध्ये तीन नवीन सिबीनॅट व ट्रनॅट मशिन तसेच ग्रामीण भागात ज्या ठिकाणी संशयित क्षयरुग्णांची एक्स-रे तपासणी मोफत करण्यासाठी नवीन चारचाकी निक्षय वाहनाची आवश्यकता असल्याची मागणी करण्यात आली.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरण कार्यक्रमातंर्गत जिल्हास्तरीय टी.बी. फोरमची बैठक पार पडली. याप्रसंगी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.गोपाल कुडलीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे, क्षयरोग वैद्यकिय अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, प्रयोगशाळा पर्यवेक्षकांसह संबंधित यंत्रणेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येतो. टीबीमुक्त ग्रामपंचायतीच्या 10 सरपंच यांचा सन्मान या दिवशी करुन त्यांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
जिल्हाभरात वर्ष 2025 मध्ये क्षयरुग्णांमध्ये तंबाखुचे सेवन करणारे 55 रुग्ण, धुम्रपान करणारे 25 रुग्ण आहेत. क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यात राबविण्यात आले यात एकुण 778 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर वर्ष 2024 मध्ये एकुण 331 ग्रामपंचायती टीबीमुक्त म्हणून पात्र ठरल्या होत्या. तर वर्ष 2025 मध्ये 566 ग्रामपंचायती टीबीमुक्त ग्रामपंचायती म्हणून पात्र ठरल्या आहेत.
3 लाख 97 नागरिकांची तपासणी
जिल्ह्यात 1 जुलै ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत टीबीमुक्त भारत अभियान राबविण्यात आले. यामध्ये सर्व तालुक्यामध्ये 3 लाख 97 हजार 216 नागरिकांची तपासणी करण्यात आली. स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये विविध आरोग्य संस्थेत आरोग्य शिबिराचे आयोजन करुन अतिजोखीमग्रस्त भागातील 47 हजार 436 महिलांची क्षयरोग विषयक आरोग्य तपासणी करण्यात आली. यातून 77 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.
समन्वयाने कामे करावीत : जिल्हाधिकारी मित्तल
टीबीमुक्त भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जात आहे. जिल्ह्यात क्षयरुग्णांचे गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रमाण कमी होवून मृत्यदरही घटला आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. क्षयरोग हा जीवाणूजन्य आजार असून तो योग्य औषधोपचाराने पुर्णपणे बरा होतो. आरोग्य विभागाने जनजागृती करत क्षयरोगाच्या समुळ उच्चाटनासाठी समन्वयाने कामे करावीत. असे निर्देश जिल्हाधिकारी मित्तल यांनी दिले.