जालना- शेती हा कष्टाचा व्यवसाय, त्यातही कोरडवाहू शेती म्हणजे नशिबाचा खेळ. पारंपरिक शेतीला फाटा देत बीजोत्पादनाचे शास्त्रशुद्ध तंत्र आत्मसात करून एक यशस्वी उद्योजक शेतकरी महिला म्हणून जालन्यातील प्रयोगशील महिला शेतकरी मोनिका पांडुरंग शर्मा यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
दरम्यान, त्यांनी निर्माण केलेल्या ब्रिडर सीड्सला ३० टक्के, तर फाउंडेशन बियाण्याला २० टक्के अतिरिक्त दर मिळतो, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. तसेच खरीपानंतर रब्बी हंगामात त्या हरभऱ्याच्या बीडीएन ७९८ आणि विश्वराज वाणाचे ४० एकरवर बीज-ोत्पादन घेतात. याप्रमाणे जिद्द आणि तंत्रज्ञानाची जोड देत जालन्याच्या मोनिका शमाँ यांनी बोज-ोत्पादनातून भरारी घेतली आहे.
ग्रामीण भागात आजही महिलांना शेतीतील दुय्यम कामांसाठी ओळखले जाते. मात्र, मोनिका शर्मा यांनी हा समज मोडीत काढला आहे. त्या स्वतः ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, बीबीएफ पेरणी यंत्र आणि रिपर यांसारखी सर्व प्रगत यंत्रसामग्री आणि अवजारे लिलया चालवतात. मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी त्यांनी यांत्रिकीकरणाचा आधार घेतला आहे.
मोनिका शर्मा यांच्याकडे ५० देशी गायींचा गोठा आहे. या गायींच्या शेणखतामुळे त्यांच्या शेतीची सुपिकता वाढली असून खताचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचला आहे. शाश्वत शेतीसाठी त्या हिरवळीचे खत (सनहेम्प), कंपोस्ट आणि आंतरपिकांचा वापर करतात. पिकांवरील कीड नियंत्रणासाठी त्या आयपीएम पद्धतीचा वापर करून निमार्क, फेरोमोन सापळे आणि पक्षी थांबे यांसारख्या पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य देतात. बीजोत्पादन हे सामान्य शेतीपेक्षा कठीण असते. यात महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे कडक नियम पाळावे लागतात. मोनिका शर्मा सांगतात की, बियाण्यांचा दर्जा राखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या निगराणीत टॅगिंग आणि सीलिंगचे काम केले जाते. यामुळे बियाण्याला विश्वासार्हता मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
६० एकरवर प्रगत शेतीचे प्रयोग
जालना तालुक्यातील खोडेपुरी येथील मोनिका शर्मा यांची ६० एकर शेती आहे. एकेकाळी केवळ घरगुती उत्पादनासाठी शेती करणाऱ्या शर्मा यांनी आता महाबीजच्या सहकार्याने बीजोत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. खरीप हंगामात त्यांनी तब्बल ५० एकर क्षेत्रावर सोयाबीनच्या आंबा या वाणाचे बीजोत्पादन घेतले. योग्य नियोजन आणि परिश्रमामुळे त्यांना ३५० क्विंटल बियाण्यांचे दर्जेदार उत्पन्न मिळाले आहे.
शेतीत केवळ कष्ट करून चालत नाही, तर त्याला नियोजनाची आणि तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागते. महाबीज आणि कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे मला बीजोत्पादनात यश मिळाले. महिलांनी आधुनिक अवजारे चालवायला शिकले, तर शेती अधिक फायदेशीर होऊ शकते.मोनिका पांडुरंग शर्मा, प्रयोगशील महिला शेतकरी, जालना