Jalna News: Water storage in small and medium projects is at a worrying level
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात या वर्षी उशिराने आगमन झालेल्या पावसाने अद्यापही सर्वदूर जोरदार हजेरी न लावल्याने मोठ्या पावसाअभावी जिल्ह्यातील ७ मध्यम व ६० लघु प्रकल्पांतील पाणीपातळीत म्हणावी तशी वाढ झालेली नाही. जून संपून जुलैचा पहिला आठवडा सुरू होऊनही मोठ्या पावसाअभावी प्रकल्पातील पाणीसाठा चिंताजनक असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने मध्यम, लघु प्रकल्प व कोल्हापूर (केटीडब्ल्यू) बंधाऱ्यांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, २९ जून रोजीच्या जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार बहुतांश प्रकल्पांमध्ये अद्यापही जलसाठा कमी असून आगामी पावसावरच पिण्याच्या पाणीपुरवठ्यासह सिंचन व्यवस्था अवलंबून आहे.
जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांमध्ये ६५.७९ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी १८.२१ दशलक्ष घनमीटर (२७.६७ टक्के) उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये कल्याण गिरिजा प्रकल्पात ४८.७१ टक्के, तर कल्याण मध्यम प्रकल्पात ४६.२४ टक्के जलसाठा आहे. इतर प्रकल्पांमध्ये जलसाठा तुलनेने कमी असून काही प्रकल्पांमध्ये तो दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे.
जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये २८.८० दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी १२.३४ दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे ४२.८५ टक्के उपयुक्त जलसाठा नोंदविण्यात आला आहे. केटीवेअर बंधाऱ्यांमध्ये २१०.१४ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी १८१.३७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून तो सुमारे ८६ टक्क्यांपर्यंत आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणांतील जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून, त्यामुळे खरीप हंगामातील सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेला दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जलसंपदा विभागाकडून धरणांच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आगामी काळात मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
३१ प्रकल्प जोत्याखाली
जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांपैकी ४ प्रकल्पांत केवळ २५ टक्के तर ३ प्रकल्पांत ५० टक्के पाणीसाठा आहे. ६० लघु प्रकल्पांपैकी २२ प्रकल्पांत २५ टक्के ४ प्रकल्पांत ५० टक्के तर ३१ प्रकल्पांतील पाणी पातळी जोत्याखाली आहे. चार प्रकल्प जुलै महिन्यातही कोरडेच आहेत.