Jalna News : There is still a big deficit of rain in the district; 47.9 percent rainfall at the end of July 30
जालना, पुढारी वृत्तसेवा: जालना जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनने अद्याप अपेक्षित जोर धरलेला नसल्याचे चित्र कायम आहे. १ जून ते ३० जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यात एकूण २८८.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस वार्षिक सरासरीच्या केवळ ४७.९ टक्के इतकाच आहे. गुरुवारी (३० जुलै) रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५.१ मिमी पाऊस झाला.
जिल्ह्यात सर्वाधिक बदनापूर तालुक्यात ३०५.४ मिमी (५१.१ टक्के) पाऊस झाला असून, त्यापाठोपाठ जालना ३२८.१ मिमी (५१ टक्के) आणि भोकरदन २७४ मिमी (५०.१ टक्के) अशी नोंद आहे.
दुसरीकडे, घनसावंगी तालुक्यात जालना केवळ २६३.७ मिमी (४१.३ टक्के) पाऊस झाल्याने सर्वात कमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल मंठा ४२.६ टक्के, परतूर ४५ टक्के आणि अंबड ४७.२ टक्के पाऊस झाला आहे.
मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ३४५.१ मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा पर्जन्यमान कमी असल्याने खरीप पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. आगामी काही दिवसांत दमदार पाऊस झाल्यासच पिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आज यलो अलर्ट; नागरिकांनी सतर्क रहावे
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार ३१ जुलै रोजी यलो अलर्ट देण्यात आला असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने नागरिकांना मेघगर्जना आणि वीज चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये, सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर व लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे, तसेच अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा आणि जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.