Jalna News: Only 29.67% Usable Water Storage in the District's 67 Projects
जालना, पुढारी वृत्तसेवा :
जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने आगामी काळात पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जालना लघु पाटबंधारे विभागाने ७ मे रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील ६७प्रकल्पांमध्ये सध्या केवळ २९.६७टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
अहवालानुसार जिल्ह्याातील ७ मध्यम प्रकल्पांमध्ये ४५.५४ टक्के तर ६० लघु प्रकल्पांमध्ये केवळ २४.७० टक्के उपयुक्त साठा उपलब्ध आहे. जिल्ह्याची एकूण उपयुक्त साठवण क्षमता २७५.९३ दलघमी असून त्यापैकी फक्त ८१.८७दलघमी पाणी उपलब्ध आहे. त्याची टक्केवारी २९.६७ टक्के इतकी आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यातील २ प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून १० प्रकल्पाची पाणी पातळी जोत्याखाली गेली आहे. तसेच १२ प्रकल्पांमध्ये० ते २५ टक्के, तर ३२ प्रकल्पांमध्ये २५ ते ५० टके पाणीसाठा उरला आहे. केवळ २ प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्के साठा उपलब्ध असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्थेवर ताण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरेगाव लघु पाझर तलावात सध्यस्थितीला ०.३५ दलघमी, जामवाडी तलावात ०.४८, नेर येथील तलावात ०.३८ दलघमी इतका जलसाठा उपलब्ध आहे. प्रशासनाने आतापासूनच पाणी नियोजनाला गती देण्याची गरज निर्माण झाली असून नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
१२ प्रकल्प जोत्याखाली
आन्वी, बरंजळा साबळे, पिंपळगाव कोलते, चिंचखेडा, ढोलखेडा, पिंपळवाडी, चांदई एक्को, रेवलगाववाडी आदींसह १२ प्रकल्प जोत्याखाली आहे