Jalna News: Government Service Provides Support to Families Affected by Atrocities
जालना, पुढारी वृत्तसेवा :
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (अॅट्रॉसिटी) दाखल झालेल्या गंभीर प्रकरणांतील दिवंगत व्यक्तींच्या वारसांना शासनाने मोठा दिलासा दिला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या जालना शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील अशा ८ पात्र वारसांची शैक्षणिक अर्हतेनुसार वर्ग-४ पदावर निवड करण्यात आली आहे. बुधवार दि.२५ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात या लाभार्थ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे संघर्षानंतर या कुटुंबांना हक्काचा आधार मिळाला आहे.
जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या शिफारशीनुसार, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमधील रिक्त पदावर या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शारदा मांदळे (पहारेकरी), संगीता रंजवे (शिपाई), रमा लाटे (पहारेकरी), साईनाथ कसारे (शिपाई), साईनाथ जाधव (सफाईगार), विशाल खरात शिपाई), दीपक जाधव (शिपाई) आणि पंकज पाटोळे (शिपाई) या आठ जणांचा समावेश आहे. केवळ जातीच्या नावाखाली अनुसूचित जातीतील लोकांचे हत्याकांड घडवण्यात आले.
जातीच्या आधारावर अत्याचर करण्यात आला. आपल्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती गमाविल्याचे दुःख बाजूला सारून शासकीय सेवेच्या माध्यमातून सन्मानाने जगण्याची नवी उमेद या वारसांच्या चेहऱ्यावर दिसून आली.
तसेच सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून घेतलेला हा निर्णय पीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल आणि अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या हस्ते हे नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले. याप्रसंगी विशेष अधिकारी स्नेहल मोदाळे, समाजकल्याण निरीक्षक अनिल सुनगत यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
प्रशासकीय कामात योगदान द्या जिल्हाधिकारी
यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नवनियुक्त उमेदवारांचे अभिनंदन करत त्यांना भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व प्रशासकीय कामात सचोटीने योगदान देण्याचे आवाहन केले.