सागर देशमुख
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध परिसरात भीषण पाणीटंचाईमुळे मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मागील आठ दिवसांपासून अनेक विहिरींचा तळ उघडा पडू लागला असून, ज्या विहिरींमध्ये कधी पाणी कमी पडत नव्हते त्या विहिरीही आटण्याच्या मार्गावर आहेत. अनेक बोरवेलचे पाणीही कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.
उन्हाचा कडाका आणि वाढते तापमान यामुळे मिरची पिकाला वारंवार पाण्याची आवश्यकता भासत आहे. मात्र पाण्याचे स्रोतच आटत असल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. अनेकांना शेजारील शेतकऱ्यांकडून पाणी मागण्याची वेळ आली असून, त्यातच वीजपुरवठ्याचा लपंडाव सुरू असल्याने "ना पाणी, ना वीज" अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे.
उभे पीक वाचवण्याचे मोठे आव्हान
पाण्याअभावी मिरचीची झाडे सुकू लागली असून पिकांची वाढ खुंटत आहे. यामुळे आळी, थ्रीप्स, मावा तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आधीच खत, औषधे आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता उभे पीक वाचवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.
जलसाठ्यांची स्थितीही अत्यंत चिंताजनक
परिसरातील जलसाठ्यांची स्थितीही अत्यंत चिंताजनक बनली आहे. पद्मावती धरणातील पाणीसाठा अवघ्या २० ते २२ टक्क्यांवर आला असून शेलूद धरणही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पुढील आठ ते पंधरा दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर बहुतांश विहिरी व बोरवेल कोरड्या पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची आवश्यकता
विशेष म्हणजे पारध, पिंपळगाव रेणुकाई, वालसावंगी, धावडा यांसह परिसरातील सुमारे ६० ते ७० गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड केली जाते. मात्र एवढ्या मोठ्या क्षेत्रावर मिरचीचे पीक घेतले जात असतानाही कीड व रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून प्रभावी मार्गदर्शन होत नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.
अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने फटका
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मिरचीवरील वाढता किडींचा प्रादुर्भाव, रोग व्यवस्थापन आणि आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत कृषी विभागाने विशेष मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे गरजेचे आहे. सातत्याने मिरचीची लागवड करूनही अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
हजारो एकरांवरील मिरची पीक धोक्यात
सरकारने दुष्काळजन्य परिस्थितीची तातडीने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करावा, जलसंधारणासाठी आपत्कालीन उपाययोजना राबवाव्यात, तसेच संभाव्य पीक नुकसानीसाठी आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. "मिरची वाचवायची की कर्ज फेडायचे?" असा ज्वलंत प्रश्न आज पारध परिसरातील हजारो शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला असून, प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत तर हजारो एकरांवरील मिरची पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.