Jalna News : मिरची पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव file photo
जालना

Jalna News : मिरची पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव

पिंपळगाव रेणुकाई : औषध फवारणीवर वाढला खर्च; यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

Jalna News: Chilli crop affected by various diseases

पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरातील मिरचीच्या पिकावर करपा, मर, बुरशीजन्य रोग तसेच विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रोगाचा फैलाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार औषध फवारणी करावी लागत असून त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. बियाणे, खते, मजुरी आणि औषधांचा खर्च आधीच वाढलेला असताना आता अतिरिक्त फवारण्यांमुळे आर्थिक भार अधिकच वाढला आहे.

यंदा मिरची उत्पादक शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. सुरुवातीला पाऊस उशिरा झाल्याने मिरची लागवड रखडली. लागवडीनंतरही पावसाअभावी पिके कोमेजण्याची वेळ आली होती. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर मोठ्या प्रयत्नांनी मिरचीचे पीक जिवंत ठेवले.

त्यानंतर पाऊस सुरू झाला असला तरी सततचे ढगाळ वातावरण, वाढलेली आर्द्रता आणि वातावरणातील बदलामुळे मिरची पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत. शेतकरी पंढरी ढमाले यांनी मिरची पिकावर रोगांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन औषध फवारणी सुरू केली आहे. वेळेत उपाययोजना केल्यास काही प्रमाणात नुकसान टाळता येईल, या आशेने ते पीक वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सतत बदलणाऱ्या हवामानामुळे रोग पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

यंदा मिरचीच्या झाडांची वाढ अपेक्षे इतकी झालेली नसून फुलधारणा व फळधारणेवरही परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पादन कमी मिळण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. बाजारभाव चांगला मिळाला तरी उत्पादन घटल्यास त्याचा आर्थिक फायदा मर्यादित राहणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सततच्या संकटाने तालुक्यातील शेतकरी हैराण झाला आहे.

यंदा पाऊस खूप उशिरा झाला. त्यामुळे लागवड केलेली मिरची कसेबसे जिवंत ठेवावी लागली. त्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे वारंवार औषध फवारणी करावी लागत आहे. प्रत्येक फवारणीला हजारो रुपयांचा खर्च होत आहे. एवढा खर्च करूनही दरवर्षीपेक्षा यंदा उत्पादन कमी मिळण्याची भीती आहे. शासनाने मिरची उत्पादक शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
- पंढरी ढमाले, शेतकरी, पिंपळगाव रेणुकाई
सततचे ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे मिरची पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी नियमित शेताची पाहणी करून रोगाची सुरुवातीची लक्षणे दिसताच कृषी विभागाच्या शिफारशीनुसार योग्य बुरशीनाशके व कीडनाशकांची फवारणी करावी.
- नंदकिशोर पायघन, कृषी सहायक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT