Jalna News: Artificial shortage of urea fertilizer; take action against those responsible
घनसावंगी, पुढारी वृत्तसेवा : घनसावंगी व अंबड तालुक्यात युरिया खताचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही काही खत विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केला आहे. या प्रकरणी दोषी विक्रेत्यांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डॉ. रमेश तारगे यांनी जिल्हा कृषी अधिकारी पी. बी. बनसोडे यांना दिलेल्या निवेदनातून केली.
निवेदनात म्हटले की, जिल्हा कृषी विभागाच्या माहितीनुसार, घनसावंगी तालुक्यात सुमारे ६८ हजार, तर अंबड तालुक्यात ५८ हजार युरिया खताच्या बॅगचा साठा उपलब्ध आहे. एवढा मोठा साठा असतानाही काही विक्रेते शेतकऱ्यांना खत उपलब्ध नसल्याचे सांगत परत पाठवत आहेत. तर काही ठिकाणी निवडक व्यक्तींनाच खताचा पुरवठा केला जात असल्याची तक्रार ग्राहक पंचायतने केली आहे.
या प्रकारामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होऊन काळाबाजाराला खतपाणी मिळत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. कुंभार पिंपळगाव येथे बेकायदेशीर युरिया खत साठा व वाहतूक प्रकरणी कृषी विभागाने केलेल्या कारवाईचे स्वागत करत संबंधित आरोपींना तातडीने अटक करून अशा गैरप्रकारांना आळा घालावा, अशी मागणीही करण्यात आली.
प्रत्येक खत विक्रेत्याने दुकानाबाहेर उपलब्ध खतसाठ्याचा फलक लावणे बंधनकारक करावे, जिल्ह्यातील खतसाठ्याची माहिती दररोज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर करावी, शेतकऱ्यांना खत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अथवा निवडक ग्राहकांनाच खत विकणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करून कायदेशीर कारवाई करावी.