जालना : आरक्षण उपवर्गीकरण समर्थन संघर्ष समिती आणि जालना जिल्हा मातंग समाजाच्या वतीने सोमवारी ( दि. ३१) आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ विराट महामोर्चा काढण्यात आला. आरक्षणाचे उपवर्गीकरण झालेच पाहिजे.., आरक्षणात न्याय हवा, वंचितांना वाटा हवा ..., अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.
दरम्यान, मस्तगड जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ्या अभिवादन करून दुपारी दोन वाजता मोर्चास सुरुवात झाली. वाजत- गाजत निघालेल्या मोर्चाचे महिलांनी नेतृत्व केले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा असलेले पिवळे झेंडे आपल्या विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन लहान बालके, मुली, महिला, तरुण, आबालबद्धांसह समाजबांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभाग नोंदवला. गांधी चमन, शनी मंदिर, उड्डाण पुलावरून नूतन वसाहत भागातून मोर्चा अंबड चौफुली जवळ आला. त्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
उपवर्गीकरणास विरोध करणाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात जावे, येत्या २९ सप्टेंबरपर्यंत शासनाने उपवर्गीकरणाची अंमलबजावणी न केल्यास मनोज जरांगे यांच्या पाठोपाठ मुंबई गाठून मुंबई बंद करा, असा सूर राज्यभरातून आलेल्या मातंग समाजातील मान्यवरांनी लगावला. तथापि वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी आरक्षण उप वर्गीकरणाबाबत भूमिका ही स्पष्ट करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
प्रशासनाच्या वतीने तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले. प्रास्ताविक रविकांत जगधने, सूत्रसंचालन किरण शिरसाठ यांनी तर कृष्णा पांडव यांनी आभार मानले. पोलीस प्रशासनाच्या वतीने मोर्चा मार्गासह सभास्थळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
इतिहासाचे विद्रुपीकरण करू नये : चांदणे
अजिंक्य चांदणे यांनी विरोध करतांना इतिहासाचे विद्रुपीकरण करू नये, मातंग समाजाला टार्गेट केले जात असून उपवर्गीकरणाची अंमलबजावणी न झाल्यास मनोज जरांगे यांच्या पाठीमागे २९ सप्टेंबरला मुंबई गाठून मुंबई बंद करा असे आवाहन केले.