जालना : जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबड ते जालना या मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृतपणे घेण्यात आलेल्या व 24 तास सुरू असणाऱ्या नळ कनेक्शनवर बुधवार(29) रोजी महानगरपालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात धडक कारवाई केली. यावेळी मुख्य वाहिनीवरील एअर व्हॉल्व्हमधून बेकायदेशीररीत्या पाणी उपसा करणारे सुमारे 68 नळ कनेक्शन काढण्यात आल्याने जालना शहराला जवळपास 1 एमएलडी पाणी पुरवठा वाढणार आहे.
जालना शहरात पाणीपट्टी भरणाऱ्या प्रामाणिक नागरिकांना आठवड्यातून एकदा पाणी मिळत असताना, मुख्य जलवाहिनीवर एअर व्हॉल्व्हद्वारे 24 तास पाणी वापरणाऱ्या बेकायदेशीर कनेक्शन घेणाऱ्यांमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा ताण येत होता.
या अनधिकृत कनेक्शनमुळे शहरात पोहचणाऱ्या पाण्याचे प्रमाण व दाब घटले होते. या तक्रारींची दखल घेऊन आयुक्त अंजली शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी 9:00 वाजता या विशेष मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
जायकवाडी येथून 25 एमएलडी पाणीपुरवठ्यापैकी 4 एमएलडी पाणी पुरवठा अंबड शहरासाठी होतो. या मोहिमेप्रसंगी सभापती पूनम राजस्वामी, उपायुक्त नंदा गायकवाड, सहायक आयुक्त अपर्णा जाधव, पाणीपुरवठा अभियंता राजेश बगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जुना व नवीन जालना वितरणप्रमुख ढगे, राजू मोरे, यांच्यासह व्हॉल्व्हमन आणि विभागाचे कर्मचारी सहभागी होते.
नागरिकांना होणारा फायदा
मुख्य जलवाहिनीवरील 68 बेकायदेशीर कनेक्शन तोडल्यामुळे पाण्याचा होणारा अपव्यय थांबला असून, जलवाहिनीतील दाबावर सकारात्मक परिणाम होणार आहे. यामुळे जालना शहरातील नागरिकांना सद्यस्थितीत मिळणारा पाणीपुरवठा अधिक लवकर आणि सुरळीत होण्यास मदत होणार आहे.पाणी चोरी थांबल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यात 1 एमएलडीची वाढ होणार आहे.