जालना : जालना जिल्ह्यातील मुदत संपलेल्या तब्बल 477 ग्रामपंचायतींच्या निवडणुका वर्षाअखेर होणार असून, या पार्श्वभूमीवर 4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
ग्रामविकास विभागाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकांसाठी आवश्यक असलेली प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली असून, नागरिकांना हरकती व सूचना नोंदविण्यासाठी 13 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. संबंधित ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अंतिम प्रभाग रचना 4 मे रोजी जाहीर झाल्यानंतर निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 31 डिसेंबरपूर्वी या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्ण करण्याचे नियोजन असून, जिल्ह्यात वर्षभर निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, 35 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी 28 एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांमुळे ग्रामपातळीवर राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे.
35 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका
जिल्ह्यात 2022 मधील ग्रामपंचायत निवडणुकांनंतर विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठीही प्रशासनाने पोटनिवडणुकीची प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 35 ग्रामपंचायतींमध्ये ही निवडणूक होणार आहे. 10 सरपंच आणि 27 सदस्य निवडून दिले जाणार आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून 29 एप्रिल रोजी निकाल जाहीर केले जाणार आहे.
4 मे ला अंतिम प्रभाग रचना
जालना जिल्ह्यातील 477 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आलेली असून यावर प्राप्त हरकतींचा विचार करून 23 एप्रिलपर्यंत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतर 4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे.