Jalna "Chief Minister's 'Majhi Ladki Bahin' Scheme"
भोकरदन, पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजनेंतर्गत सुरुवातीला नियमित अनुदान मिळालेल्या अनेक महिलांचे हप्ते अचानक बंद झाल्याने राज्यभरात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रातील सुमारे ९८ लाख महिला विविध कारणांमुळे योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्याची चर्चा असून, भोकरदन तालुक्यातील पारध येथील अनेक महिलांनाही याचा फटका बसला आहे.
लाभार्थी महिलांच्या म्हणण्यानुसार, योजनेचे सुरुवातीचे पाच ते सहा हप्ते नियमितपणे त्यांच्या खात्यावर जमा झाले. मात्र त्यानंतर अचानक अनुदान येणे बंद झाले. चौकशी केली असता केवायसी अपूर्ण असल्याचे किंवा कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचे कारण सांगण्यात आले.
यामुळे अनेक महिलांना वारंवार सीएससी केंद्र, सेतू सुविधा केंद्र आणि संबंधित कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. विशेष म्हणजे काही कुटुंबांमध्ये एकाच रेशनकार्डवर दोन महिलांना लाभ मिळत असताना, इतर अनेक महिलांचे लाभ विविध तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आल्याची तक्रार आहे. त्यामुळे योजनेच्या निकषांबाबत संभ्रम आणि असंतोष वाढत आहे. सुरुवातीला सर्व पात्र महिलांना लाभ देण्याचा उद्देश असलेल्या योजनेत आता अटी-शर्ती अधिक कठोर होत असल्याची भावना महिलांमध्ये निर्माण झाली आहे.
अनुदान बंद झालेल्या महिलांनी शासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत, केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करून प्रलंबित त्रुटी तत्काळ दूर करण्याची मागणी केली आहे. तसेच पात्र असूनही लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांचे अर्ज पुन्हा तपासून त्यांचे थकीत व नियमित हप्ते त्वरित सुरू करण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दिलासा द्यावा
राज्यातील लाखो महिलांसाठी आर्थिक आधार ठरलेली ही योजना अधिक पारदर्शक व सुलभ पद्धतीने राबवून कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी, अशी मागणी भोकरदन तालुक्यासह राज्यभरातील महिलांकडून होत आहे. शासनाने केवायसीसंदर्भातील अडचणी तातडीने दूर करून लाभार्थीना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सुरुवातीचे काही हप्ते मला नियमितपणे मिळाले होते. मात्र अचानक माझे अनुदान बंद झाले. चौकशी केल्यानंतर केवायसीमध्ये त्रुटी असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी मी अनेक वेळा केवायसी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली, तरीही आजपर्यंत अनुदान पुन्हा सुरू झालेले नाही. आमच्यासारख्या अनेक महिलांना या योजनेचा मोठा आधार होता. त्यामुळे शासनाने केवायसीतील त्रुटी तातडीने दूर करून बंद झालेल्या सर्व पात्र महिलांचे हप्ते पुन्हा सुरू करावेत.भाग्यश्री तबडे, लाभार्थी महिला