वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. सोलापूर- धुळे महामार्गावर अंबड तालुक्यातील महाकाळा येथे उभ्या ट्रकला कार धडकून हा भीषण अपघात आज (दि. १) दुपारी बाराच्या सुमारास झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर येथील कुटे व जालना येथील चौरे कुटुंबीय हे अक्कलकोट येथून देवदर्शन करून परत येत होते. ते आपल्या कारने (एमएच २० सीएस ६०४१) घरी परत येत होते. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा चक्काचूर झाला.
या अपघातातील मृतांची नावे अनिता परशुराम कुटे (वय ४८, रा. छ. संभाजीनगर) , भागवत यशवंत चौरे (वय ४७), सृष्टी भागवत चौरे (वय १३), वेदांत भागवत चौरे (वय ११, सर्व रा.अंबड रोड जालना) येथील रहिवाशी आहेत. गाडीचा चालक जखमी झाला आहे. परशुराम लक्ष्मण कुटे ५५ हे स्वतः गाडी चालवत होते. ते छ.संभाजीनगर येथील रहिवाशी आहेत. तर छाया भागवत चौरे (वय ४०, रा. अंबड रोड, जालना) या जखमी झाल्या आहेत.
अक्कलकोटवरून गणपूरला जात असलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात होऊन चार भाविकांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. मृत सर्व एकाच कुटुंबातील असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोलापूर- धुळे महामार्गावर महाकाळा येथे आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. यात महामार्गावर नादुरुस्त उभ्या असलेल्या केए ३२ डी ९२८३ या ट्रकला बीडकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या चारचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त कार मध्ये सहा जण होते. यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान घटनास्थळी गोंदी पोलीस दाखल झाले असून या अपघातात जखमी झालेल्यांना छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. तर या अपघातामध्ये मृत झालेले चौघेजण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर येत आहे.