जालना : जालना शहरासह जिल्ह्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत तरुणांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला.
जालना शहरासह जिल्ह्यात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीचे पाणीवेश येथे स्वागत करण्यात आले. मिरवणुकीमुळे शहरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मिरवणुकीदरम्यान बसस्थानक, सुभाष चौक, मंमादेवी, मस्तगड, गांधी चमन, जामा मस्जिद चौक, अंबड चौफुली, नूतन वसाहत, भोकरदन नाका, रेल्वे स्टेशन आणि मोती बाग या प्रमुख मार्गांवरून वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली होती. शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन करून नागरिकांना मार्गदर्शन केले.
बसस्थानक, लक्कडकोट, पेशवे चौक, विठ्ठल मंदिर, गांधी चमन, तसेच राजाबाग सवार दर्गा आणि कैकाडी मोहल्ला मार्गे वाहतूक वळविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, काद्राबाद, पाणीवेस आणि गरीबशहा बाजार येथून जाणाऱ्या वाहनांसाठीही बायपास, अंबड चौफुली आणि नूतन वसाहत मार्ग उपलब्ध करून देण्यात आले होते. रेल्वे स्टेशन, मनपा, टाऊन हॉल परिसर आणि माळीपुरा भागातील वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.
दरम्यान, मिरवणुकीत डीजे आणि गाण्यांच्या तालावर तरुणाईने उत्स्फूर्तपणे ठेका धरत जल्लोष केला. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय संघटनांच्या प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग नोंदविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी शहरातील मस्तगड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मंगळवारी सकाळपासून मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
मिरवणुकीदरम्यान विविध समाजसेवी संस्थांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची, चहा आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त 14 हजार 135 लाडूंचा महाप्रसाद महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, शिवसेना नेते भास्करराव आंबेकर यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आला.जालना सायकलिस्ट ग्रुप व फॅब रनर ग्रुपच्यावतीने शहरात भव्य सायकल रॅली काढून शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला. अत्यंत शिस्तबद्ध नियोजन,चोख पोलिस बंदोबस्त आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे जयंती शांततेत पार पडली.
गाणे व जयघोष
भीमा तुझ्या जन्मामुळे, माझ्या भीमाची पुण्याई यांसह विविध गाण्यांवर तरुणांनी ठेका धरला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. मिरवणुकीत महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.