जालना : जालना जिल्ह्यातील एसटी प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अंबड आणि परतूर एसटी आगाराच्या ताफ्यात एकूण ८ नवीन 'राजमाता जिजाऊ' बसेस दाखल झाल्या आहेत. या नव्या बसेसमुळे हजारो प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जालना जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या आगारांना नवीन बसगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
अंबड एसटी आगाराच्या ताफ्यात ३ नवीन 'राजमाता जिजाऊ' बसेस, तर परतूर एसटी आगाराच्या ताफ्यात ५ नवीन 'राजमाता जिजाऊ' बसेस दाखल झाल्या आहेत. दोन्ही ठिकाणी या बसेसचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
या नवीन बसेसमुळे अंबड आणि परतूर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार तसेच सर्वसामान्य प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि नियमित प्रवासाची सुविधा मिळणार आहे.
या बसेस उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आलेल्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले असून, भविष्यातही जनतेच्या हितासाठी आणि ग्रामीण वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
आठ बसेस दाखल- सार्वजनिक वाहतूक ही ग्रामीण विकासाचा महत्त्वाचा आधार मानली जाते. अंबड आणि परतूर आगारात नव्या बसेस सेवेत दाखल झाल्याने गाव आणि शहरांमधील दळणवळण अधिक सक्षम होणार आहे. जालना जिल्ह्यातील परतूर ५ आणि अंबड आगारासाठी ३ बसेस दाखल झाल्या आहेत. प्रवाशांना दिलासा मिळेल.मनीषा सपकाळ, विभाग नियंत्रक, जालना.