Ambad Taluka Cotton Crops Dry Up Pudhari
जालना

Crop Damage Jalna | अंबड तालुक्यात कपाशी पिके सुकली; खरिपावर दुष्काळाचे सावट

पावसाचा प्रदीर्घ खंड; सोयाबीन, तूर, मूग, मक्यासह खरीप पिके संकटात; तातडीने पंचनामा करून दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Ambad Taluka Cotton Crops Dry Up

विलास बा. जाधव

जामखेड : अंबड तालुक्यातील जामखेडसह परिसरात पावसाने प्रदीर्घ उघडीप दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पावसाअभावी जमिनीतील ओल झपाट्याने कमी होत असून, कपाशीची पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीन, तूर, मूग, मका यांसह अन्य खरीप पिकांवरही पाण्याअभावी संकट ओढवले आहे. आणखी काही दिवस पाऊस न झाल्यास हातातोंडाशी आलेला खरीप हंगाम जळून जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

यंदा सुरुवातीला पावसाचे वातावरण समाधानकारक राहिल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. बियाणे, खते, कीटकनाशके, मशागत आणि मजुरीवर मोठा खर्च केला. मात्र, पिके वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कपाशीची पाने कोमेजली

कपाशी पिकाला सध्या पाण्याची मोठी गरज असताना पावसाचा खंड पडल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. परिणामी अनेक शेतांमध्ये कपाशीची पाने कोमेजून झाडे सुकण्यास सुरुवात झाली आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी उपलब्ध विहीर, बोअरवेल व इतर जलस्रोतांच्या आधारे पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र अनेक ठिकाणी पाण्याची उपलब्धताच अपुरी असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

महागडा खर्च पाण्यात जाण्याची भीती

खरीप पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली आहे. महागडी बियाणे, खते, औषधे, मशागत व मजुरीचा खर्च करून पिके उभी केली. मात्र, पावसाच्या खंडामुळे उत्पादनाची आशा धूसर झाली असून केलेला खर्चही वसूल होईल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

चारा व पाणीटंचाईचे सावट

पावसाचा खंड आणखी वाढल्यास केवळ खरीप पिकांचेच नुकसान होणार नसून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील विहिरी, बोअरवेल व इतर जलस्रोतांवरील पाण्याचा ताण वाढत असून आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तातडीने पंचनामे करण्याची मागणी

अंबड तालुक्यातील सद्यस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गावनिहाय पिकांची पाहणी करावी. पावसाचा खंड, पिकांची सद्यस्थिती, उपलब्ध पाणीसाठा आणि संभाव्य नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने पंचनामे करावेत. परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पीकविमा भरपाई तसेच पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्यासाठी तातडीच्या उपाययोजना करण्याची मागणीही जोर धरत आहे.

सुरुवातीला पाऊस झाल्याने पीक चांगले येईल अशी अपेक्षा होती. मात्र, आता पावसाने मोठा खंड घेतल्याने कपाशी सुकू लागली आहे. आणखी काही दिवस पाऊस झाला नाही तर संपूर्ण खरीप हंगाम हातातून जाण्याची भीती आहे. शासनाने तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.
— श्री. बाबुलाल जाधव, चिंताग्रस्त शेतकरी, जामखेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT