परतूर : तालुक्यातील परतूर-वाटूर रस्त्यावर शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास काळाने भीषण घाला घातला. रोहीना बुद्रुक जवळील आय.डी.आय. प्रशिक्षण केंद्रासमोर एका भरधाव टेम्पोने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रंगनाथ विश्वनाथ मोरे (वय ३०) आणि नितीन मधुकर खारवणे (वय २५, दोघे रा. पाकणी, ता. मंठा, जि. जालना) अशी मृतांची नावे आहेत. तर गणेश राऊत (वय ३०, रा. माजलगाव) हा या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मृत तरुण आपल्या दुचाकीवरून वाटूरच्या दिशेने जात होते. याचवेळी रोहिना जवळ एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला आय.डी.आय. केंद्राजवळ जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोघे तरुण रस्त्यावर फेकले गेले आणि जागीच गतप्राण झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
घटनेची माहिती मिळताच परतूर पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळी पोहचले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. के. अंभारे यांनी दोन्ही तरुणांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक भीमराव मुंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या अपघातामुळे मंठा तालुक्यातील पाकणी गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीकक्ष भीमराव मुंढे, पोलीस अंमलदार परमेश्वर माने, वंदन पवार करीत आहे.