jalna 306 Accidents in 27 Months: 23 Killed, 61 Seriously Injured
जालना, पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्याच्या हद्दीतून जाणाऱ्या ५० किलोमीटरच्या समृद्धी महामार्गावर गत २७ महिन्यात सुमारे ३०६ अपघात झाले आहेत. या अपघातात एकूण २३ जणांना आपला प्राण गमवावा लागला असून, सुमारे ६१ गंभीर तर १७० जणं किरकोळ जखमी झाले आहेत.
दरम्यान, सन २०२४ आणि २०२५ या दोन वर्षांत अपघातांची संख्या वाढली असून, २०२६ च्या सुरुवातीपासूनच अपघातांची नोंद सुरू झाल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, २०२४ मध्ये एकूण १३६ अपघातांची नोंद झाली होती.
यामध्ये ९ अपघातांमध्ये १६ जणांचा मृत्यू झाला, तर ११ अपघातांत २२ जण गंभीर जखमी झाले. सर्वाधिक ३८ अपघात किरकोळ जखमींचे होते, ज्यात ६० जण जखमी झाले. तसेच ७८ अपघातांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. २०२५ मध्ये अपघातांची संख्या वाढून १४५ वर पोहोचली. मात्र, या वर्षी मृत्यूंचे प्रमाण कमी होऊन ७ इतके राहिले. गंभीर जखमींची संख्या ३७ वर गेली असून, किरकोळ जखमींची संख्या ९९ इतकी नोंदली गेली आहे. विशेष म्हणजे, ५० अपघातांमध्ये किरकोळ दुखापती झाल्या, तर ७९ अपघातांमध्ये कोणतीही जखम झाली नाही.
दरम्यान, २०२६ च्या मार्च अखेरपर्यंत २५ अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये १ अपघातात २ जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच ११ अपघातांमध्ये १८ जण किरकोळ जखमी झाले असून, १३ अपघात बिना जखमीचे आहेत. समृद्धी महामार्गावर वेग, निष्काळजीपणा आणि नियमभंग ही अपघातांची प्रमुख कारणे स्पष्ट होत आहे.
बुधवारी ८ जणांचा बळी
१ एप्रिल रोजी ८ जणांचा बळी गेला. समृध्दी महामार्गावरील कडवंची शिवारात ट्रकने पिकअपला दिलेल्या धडकेत पिकअप मधील ८ मजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला. या मार्गावर अक्षरशाः हाडामासांचा सडा पडला होता. या दुर्घटनेमुळे पुन्हा समृध्दी महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चालू वर्षातील हा सर्वात मोठा अपघात ठरला.
जालना हद्दीतील समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. आकडेवारीनुसार बहुतांश अपघात किरकोळ स्वरूपाचे असले तरी त्यामागे वेग आणि निष्काळजीपणा हेच प्रमुख कारण आहे. सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादा पाळणे आणि थकवा टाळणे या साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास मोठा धोका संभवतो.- श्री निकम, सपोनि, महामार्ग पोलिस जालना.