Jalna Water News : चिंता वाढली ! १७ तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर ! File Photo
जालना

Jalna Water News : चिंता वाढली ! १७ तलाव कोरडे पडण्याच्या मार्गावर !

७ मध्यम आणि ६० लघु प्रकल्पांत केवळ ३१.४५ दलघमी जलसाठा

पुढारी वृत्तसेवा

Jalna 17 Lakes on the Verge of Drying Up!

जालना, पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्याचा शेवटचा टप्पा सुरू असतानाच जालना जिल्ह्यातील जलसंकट कमालीचे गडद झाले आहे. जिल्ह्यातील ६० लघु प्रकल्पांपैकी तब्बल ३ तलाव पूर्णपणे कोरडे ठाक पडले असून १४ तलाव जोत्याच्या खाली (जलपातळी खालावली) गेले आहेत. जिल्ह्यातील एकूण ६७ मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये सध्या केवळ ५७.०४ दलघमी म्हणजेच सरासरी २०.६७ टक्के पाणी शिल्लक राहिल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील ७ मध्यम प्रकल्पांची एकूण साठवण क्षमता ६५.७९ दलघमी असून, सध्या त्यात २५.५८ दलघमी (३८.८८ टक्के) उपयुक्त साठा आहे. यामध्ये जालना तालुक्यातील कल्याण गिरजा प्रकल्पात ५.२५ दलघमी (५४.२९ टक्के) तर कल्याण मध्यम प्रकल्पात ६.८८ दलघमी (५६.३०टक्के) साठा उपलब्ध आहे. या उलट भोकरदन तालुक्यातील जुई मध्यम प्रकल्पाची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, तिथे केवळ ०.८० दलघमी (१३.३४ टक्के) पाणी उरले आहे. धामना प्रकल्पात २०.१७ टक्के, जीवरेखामध्ये १६.४७टक्के आणि अंबडच्या गल्हाटी मध्यम प्रकल्पात ५.४५ दलघमी (३९.३७ टक्के) पाणी उपलब्ध आहे.

लघु प्रकल्पांचा तळ दिसू लागला ! जिल्ह्यातील ६० लघु प्रकल्पांची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे. पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या पहिल्या २६ लघु प्रकल्पांमध्ये ६.९७दलघमी (१५.१३ टक्के) तर उर्वरित ३४ लघु प्रकल्पांमध्ये २४.४९ दलघमी (१४.९२ टक्के) साठा शिल्लक आहे. ६० पैकी तब्बल १४ तलाव जोत्याच्या खाली गेल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना विस्कळीत होण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधारे आणि उच्च पातळी बंधाऱ्यांमधील बहुतांश पाणीसाठा संपुष्टात आला असून अनेक ठिकाणी जोपाखा (जोत्याखालील पाणीसाठा) परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या मान्सून श्रीलंका बेटावर येऊन अडकला आहे. मान्सूनचे वेध लागलेले असले तरी प्रत्यक्षात पाऊस पडेपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे.

बंधारेही कोरडे; पाऊस लांबल्यास आव्हाने वाढणार !

जिल्ह्यातील को.प. बंधारे आणि उच्च पातळी बंधाऱ्यांमधील बहुतांश पाणीसाठा संपुष्टात आला असून अनेक ठिकाणी जोपाखा (जोत्याखालील पाणीसाठा) परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनचे वेध लागलेले असले तरी प्रत्यक्षात पाऊस पडेपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT