

उंब्रज : उंब्रजसह परिसराला शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह आलेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. सुमारे एक तास झालेल्या या अवकाळी पावसाने सर्वत्र पाणीच पाणी केले असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान अवकाळी पावसाने उंब्रज येथील पाटण तिकाटणा येथे तसेच राष्ट्रीय महामार्गावर भोसलेवाडी येथे पाण्याचे तळे निर्माण झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागली. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होवून लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
उंब्रजसह परिसरात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वादळी वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला होता. उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. मात्र आजच्या अवकाळी पावसाने हवेत गारवा पसरला होता. अवकाळी पावसाने रस्त्याच्या दुतर्फा असलेले नाले पाण्याने तुडुंब भरून वाहत होते. तर ठिकठिकाणी रस्त्यावर व शेतात पाणी साचले होते.
दरम्यान, गतवर्षी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र या गंभीर समस्येकडे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी; वाहनांच्या रांगा
उंब्रज येथील पाटण तिकाटणा येथे रस्त्यावर पाणी साचून पाण्याचे तळे निर्माण झाले होते. तर भोसलेवाडी येथे महामार्गावर जवळपास गुडघाभर पाणी साचल्याने या पाण्यातून वाहनधारकांना रस्ता शोधावा लागत होता. यावेळी वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती. तसेच महामार्गावर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होवून वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. मात्र या गंभीर समस्येकडे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी मात्र सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवले.