Jalana Accept the acceptance of regular students without Aadhaar
जालना, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या आधार विरहित विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश आणि शालेय पोषण आहार यासह इतर सुविधा मिळतात. मात्र या विद्यार्थ्यांना संचमान्यतासाठी ग्राह्य धरले जात नाही हे अत्यंत खेदजनक असून आधार नसलेले पण शाळेत नियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांना संचमान्यतासाठी ग्राह्य धरावे अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने शिक्षणमंत्री श्री दादासाहेब भुसे यांच्यासह शिक्षण आयुक्त व शिक्षणसंचालक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक विद्यार्थी आधार विरहीत आहेत. परिणामी याचा फटका ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर होत असून राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. आधार विरहित विद्यार्थी संच मान्यतेला ग्राह्य न धरल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत.
याअतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी राज्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये जागा रिक्त राहिलेल्या नाहीत. त्यामुळे हे समायोजन रद्द करून नियमित शाळेत येणारे आधार विहित विद्यार्थी संचमान्यतासाठी ग्राह्य धरावेत अशी मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू, संजय हेरकर अमोल तोंडे यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
आधार विरहित पण नियमित जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी हे संचमान्यतेसाठी ग्राह्य धरावेत. अशा विद्यार्थ्यांची केंद्रप्रमुख मार्फत पडताळणी करून हे विद्यार्थी संच मान्यतेस ग्राहय धरल्यास ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सुरळीत राहील.-संतोष रघुनाथ राजगुरु, राज्याध्यक्ष प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य