Sprinkler Irrigation : रब्बी पिकांसाठी तुषार सिंचनाचा वाढता वापर, पाण्याची बचत File Photo
जालना

Sprinkler Irrigation : रब्बी पिकांसाठी तुषार सिंचनाचा वाढता वापर, पाण्याची बचत

कमी पाण्यात अधिक क्षेत्रावरील पिकांना पाणी

पुढारी वृत्तसेवा

Increased use of sprinkler irrigation for Rabi crops, resulting in water conservation.

घनसावंगी, पुढारी वृत्तसेवाः तालुक्यात रब्बी हंगाम जोमात सुरू असून गहू व हरभरा ही प्रमुख पिके सध्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. या काळात सुरू असलेल्या थंडीच्या वातावरणाचा योग्य लाभघेण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत. वाढता खर्च आणि बदलते हवामान या पार्श्वभूमीवर तुषार सिंचन ही शाश्वत आणि परिणामकारक पद्धत ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

घनसावंगी तालुक्यात गहू पिक फुटव्याच्या अवस्थेत आहेत. काही ठिकाणी ओंवी भरण्याच्या काळात समसमान ओलावा मिळणे अत्यंत गरजेचे असते. तुषार सिंचनामुळे संपूर्ण शेतात एकसारखे पाणी पडत असल्याने पिकाची वाढ संतुलित होते. पानांचा तजेला वाढून गहू पीक अधिक जोमदार दिसत आहे. हरभरा घाटे धरण्याच्या अवस्थेत हलक्या पण वेळेवर दिलेल्या तुषार सिंचनामुळे पिकाला चांगली वाढ मिळत असल्याचे निरीक्षण आहे.

पारंपरिक पाटपाणी पद्धतीत मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाते. त्याउलट तुषार सिंचनामुळे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत पाण्याची बचत होते. जमिनीची धूप कमी होते, ओलावा टिकून राहतो आणि खतांची कार्यक्षमताही वाढते. विशेषतः हलक्या व मध्यम जमिनीत तुषार सिंचन अधिक उपयुक्त ठरत आहे. कमी वेळेत सिंचन पूर्ण होत असल्याने विजेचा वापर कमी होऊन शेतकऱ्यांचा खर्चही घटत आहे.

कृषी विभाग व तज्ज्ञांकडूनही शेतकऱ्यांना आधुनिक सिंचन पद्धती स्वीकारण्याचे मार्गदर्शन केले जात आहे. शासनाच्या सूक्ष्म सिंचन योजनांअंतर्गत अनुदान उपलब्ध असल्याने अनेक शेतकरी तुषार संच बसवत आहेत. काही प्रगतशील शेतकऱ्यांनी सांगितले की, मागील हंगामात तुषार सिंचनामुळे गहू व हरभरा पिकांचे उत्पादन समाधानकारक मिळाले आहे. एकूणच, गहू व हरभरा पिकांसाठी तुषार सिंचनाचा वाढता वापर हा शेतीतील सकारात्मक बदल मानला जात असून, पाणी बचत, खर्चात कपात आणि उत्पादनवाढ या दृष्टीने ही पद्धत भविष्यात अधिक उपयुक्त ठरणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

पाण्याची बचतः पारंपारिक प्रवाहाच्या सिंचनाच्या तुलनेत ३०% ते ४०% पाण्याची बचत होते. समतल नसलेल्या जमिनीसाठी उपयुक्तः उतार असलेल्या किंवा समतल नसलेल्या जमिनीवरही पाणी समान प्रमाणात देता येते. समान पाणी वितरणः पिकाच्या संपूर्ण क्षेत्राला पाणी समान प्रमाणात मिळते, ज्यामुळे चांगली आणि एकसमान वाढ होते. अर्ज करण्यासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या महाडीबीटी या योजनेमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तुषार सिंचन घटकासाठी अनुदान उपलब्ध आहे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
-वशिष्ट रेंगे सहाय्यक कृषी अधिकारी, घनसावंगी
यावर्षी गहू आणि हरभरा पिकासाठी तुषार सिंचनाचा वापर केल्यामुळे पिकाला वेळेवर व समसमान पाणी मिळाले. पाटपाणी दिल्यास जास्त पाणी खर्च होत होते, पण तुषारमुळे कमी पाण्यात चांगली ओल राहिली. पिकाची वाढ एकसारखी झाली असून पानांचा तजेला वाढलेला दिसतो. पाट पाणी बंद केल्यामुळे मजुरीचा खर्चही कमी झाला आहे. तुषार मुळे गव्हाची वाढ चांगली आहे. असाच परिणाम राहिला तर उत्पादन नक्कीच वाढेल,
- अंगत घोगरे, शेतकरी म चिंचोली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT