Renuka Mata Yatra pudhari photo
जालना

Renuka Mata Yatra : शिळादेवीला पातळ गेल्यावरच भरते यात्रा

10 एप्रिलला पातळ चढविणार, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

घनसावंगी ः तालुक्यातील बोडखा येथील ग्रामस्थांच्या वतीने शिळादेवीला पातळ गेल्यावरच देवी देहगाव येथील रेणुका मातेची यात्रा भरण्यास सुरुवात होते. बोडखा येथील ग्रामस्थ चैत्र पौर्णिमेच्या सातव्या दिवशी गुरुवारी (दि.9) रोजी हे पातळ गावातून मिरवणूक काढून देवी दहेगावला भाविक पायी चालत जातात आणि आठव्या दिवशी म्हणेजच त्याच दिवशी 12 वाजण्याच्यानंतर शुक्रवारी (दि.10) रोजी हे पातळ शिळादेवीला चढविण्यात येणार आहे. यानंतरच यात्रेला सुरुवात होते.

तालुक्यातील ‌‘बोडख्याची शिळादेवी‌’ आणि देवी दहेगाव येथील रेणुकादेवीचे हे 12 व्या 13 व्या दशकातील हेमांडपंथी मंदिर आहे. या यात्रेला सुमारे 1300 वर्षांची परंपरा असल्याने दर्शनासाठी लाखो भाविक मोठ्या संख्येने येतात. तसेच येथे बोललेला नवस फेडण्यासाठी देखील गर्दी होते. या यात्रेमागील दंतकथा आजही भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू ठरते. बोडखा गावातील एका सुवासिनीची कथा यामागे सांगितली जाते.

ही सुवासिनी दररोज रात्री, पाऊस असो वा अंधाराची रात्र असो, नित्यनियमाने देवी देहगाव येथे रेणुका मातेच्या दर्शनासाठी जात असे. विशेष म्हणजे पावसाळ्यात नदीला पूर आलेला असतानाही ती कुठलाही संकोच न बाळगता नदीत उतरायची. आणि चालताना पाण्यात पाय ठेवताच पाणी आपोआप बाजूला सरकून तिला मार्ग करून देत असल्याची श्रद्धा आजही भाविकांमध्ये प्रचलित आहे.

पौर्णिमेपासून बोडखा येथे शिळादेवीला आठवडाभर तेल अर्पण करण्याची परंपरा आजही जपली जाते. या काळात गावात कावड बसवून धार्मिक वातावरण निर्माण केले जाते. त्यानंतर आठवड्यानंतर वाजत-गाजत पातळ घेऊन भाविक पायी देवी देहगावकडे प्रस्थान करतात. देवी देहगाव येथे पोहोचल्यानंतर कल्लोळात स्नान करून प्रथम शिळादेवीला आणि त्यानंतर रेणुका देवीला पातळ नेसवण्याचा विधी पार पडतो. या धार्मिक सोहळ्यानंतर भाविकांना प्रसादरूपाने भोजन दिले जाते. यात्रेच्या पुढील टप्प्यात बोडखा येथील भाविक टेभे घेऊन पुन्हा देवी देहगावला जातात.

8 दिवस चालणाऱ्या या यात्रेत मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती पाहायला मिळते. 9 एप्रिल रोजी बोडखा येथून शिळा देवीसाठी पातळ नेण्याचा मुख्य सोहळा पार पडणार असून त्यानंतर येथे मोठी यात्रा भरते.विशेष म्हणजे आजही बोडखा गावात नवीन विवाह झाल्यानंतर बोकडाची कंदुरी करण्याची पारंपरिक प्रथा जपली जाते. श्रद्धा, चमत्कार आणि परंपरेचा अनोखा वारसा जपणारी ही यात्रा आहे.

मंदिराचे नक्षीकाम दगडात कोरलेले नक्षीकाम

गाभाऱ्यात रेणुका मातेसमोर अखंड नंदादिवा प्रज्वलित असतो. या मंदिरासमोर दगडी सभामंडप असून, या सभामंडपाच्या खांबांवर कोरीव नक्षीकाम आहे. मंदिराच्या पुढे कल्लोळ आहे. मंदिर परिसरात संत-महात्म्यांच्या कीर्तन-भजनांचा कार्यक्रम सातत्याने होत असतो. यात्रेदरम्यान सांस्कृतिक व धार्मिक सोहळे मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात. हे मंदिर केवळ धार्मिक नाही तर सामाजिक एकतेचेही प्रतीक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT