First rains wreak havoc in the district; livestock killed by lightning strikes
जालना, पुढारी वृत्तसेवाः जालना शहरासह जिल्ह्यात बुधवारी पहाटे पडलेल्या संततधार पावसामुळे दाणादाण उडवली. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात २१.३ मिमी पावसाची नोंद झाली. जालना शहरासह रामनगर, पाचनवडगाव, धनगरपिंप्री मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. रामनगर पावसामुळे माऊली लकडे यांच्या घराची भिंत पडली. जाफराबाद तालुक्यातील चिंचखेडा, घाणखेडा व दहीगाव येथे वीज पडुन जनावरे दगावली.
जालना शहरात बुधवारी पहाटे ३ वाजेपासुन संततधार पावसास सुरुवात झाली. शहरातील सोनल नगर, नरिमान नगर, इंदौरा नगरसह अनेक भागात पावसाचे पाणी शिरल्याने नागरीकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागला. पहिल्याच पावसाने महापालीकेच्या नाले सफाईचे पितळ उघडे पडुन ठिकठिकाणी तुंबलेल्या गटारीतील पाणी रस्त्यावर साचल्याचे दिसुन आले.
सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाल्या तुंबल्याने या भागात पाणी नागरीकांच्या घरासमोर तुंबल्यानने दुर्गंधी व घाणीमुळे नागरीकांना अडचणीचा सामना करावा लागला. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आल्याचे दिसुन आले. नवीन जालन्यातील जिंदल कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावरील दुकानासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसुन आले.
जालना शहरातील अंबड चौफुलीकडुन मंठा, परतुर, परभणीकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावरील कुंडलीका नदीवरील पुलाचे काम अर्धवट असल्याने पुलाच्या बाजुने करण्यात आलेल्या वळण रस्त्यावर कुंडलीका नदी पात्रातील पाणी पातळीत वाढ झाल्याने हा वळण रस्ता बंद करण्यात आला. यामुळे वाहनांना इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. या ठिकाणी शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भारती, जमादार संजय मगरे यांनी भेट देउन वाहतुक इतर मार्गाने वळवली.
जालना तालुक्यातील रामनगर येथे माऊली लकडे यांच्या घराची भिंत वादळी वारे व पावसामुळे पडली. जाफ्राबाद तालुक्यातील चिंचखेडा येथिल गट क्र २६९ मधील शेतकरी ०राहुल सुखदेवराव जाधव तसेच घाणखेडा येथिल शेतकरी उद्धव महादू ढाले यांची म्हैस पावसामुळे दगावली. दहीगाव येथील शेतकरी नितीन शिवाजीराव देशमुख यांची गाय रात्रीच्या पावसात वीज पडून मयत झाली. अंबड तालुक्यातील महाकाळा येथे गट क्रम १७७ मधे विलास रंगनाथ कवळे यांची गाय वीज पडुन मरण पावली.
जालना जिल्ह्यात जुन महिना संपत आला असतांनाच पाउस पडला नसल्याकने शेतकरी अडचणीत सापडला होता. गेल्या अनेक दिवसापासुन पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना बुधवारी सकाळी पडलेल्यां पावसाने दिलासा दिला. या पावसामुळे आगामी काही दिवसात खोंळबलेल्या खरीपाच्या पेरण्या मार्गी लागणार आहे. जिल्ह्यातील मंठा व परतुर तालुक्यात बुधवारचा पाऊस पडला नसल्याने या भागात समाधानकारक पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
जिल्ह्यात मागील चोवीस तासात २१.३ मीमी पावसाची नोंद झाली असून १ ते २४ जुन पर्यंत जिल्ह्यात ७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे आगामी काही दिवसात खरीप पेरण्यांना वेग येणार असून बियाणे व खतांची दुकाने फुलून गेल्याचे पहावयास मिळणार आहे.
४५ मि.मी. पावसाची नोंद
जालना जिल्ह्यात मागील चोवीस तासांत तालुकानिहाय पडलेला पाऊस कंसात तर कंसाबाहेर आजपर्यंत पडलेला एकुण पाऊस पुढील प्रमाणे जालना (४४.८) ६४.२, बदनापूर (१५.६) ३०.८, भोकरदन (१६.४) ३३.९, जाफराबाद (१३) ५६.१, परतूर (१.९)२३.७, मंठा (०) १५.५, अंबड (४०.१)६५, घनसावंगी (१७.१)५५.९ असा एकूण ४५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहें.