Favorable conditions for sowing in the Tembhurni area following the first rains
टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा : "पाऊस येईल का? पेरलं तर उगवेल का?" या विवंचनेत असलेल्या टेंभुर्णी परिसरातील बळीराजाला अखेर आद्रा नक्षत्रातील पहिल्या पावसाने दिलासा दिला आहे. यंदाच्या खरीप हंगामात मृग नक्षत्रातील पेरणी पूर्णपणे वाया गेल्याने खचलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
गेल्या 48 तासांत झालेल्या पावसामुळे जमिनीत पेरणीयोग्य ओल तयार झाली आहे. या संधीचा फायदा घेत टेंभुर्णी, आकोला देव पापळ, काळेगाव कुंभाझरी शिवारात महिला शेतकरी व मजुरांनी कापूस आणि मक्याच्या लागवडीला वेगाने सुरुवात केली आहे. सोमवारी व मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासूनच टेंभुर्णीच्या शिवारात चित्र बदललेलं होतं.
डोक्यावर बियाण्याची टोपली, हातात टोकणीसाठी काठी घेऊन १५ ते २० महिलांचा जथ्था शेतातील रानात दिसत आहेत. आद्राची पेर, घरात भरभरून शेर" या ग्रामीण म्हणीवर शेतकऱ्यांचा गाढ विश्वास. हवामान खात्याने पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण व तुरळक सरींचा अंदाज वर्तवला आहे.
कापूस व मका पेरणीसाठी ३० जून ते १५ जुलै हा सर्वोत्तम काळ मानला जातो. पुन्हा पाऊस लांबल्यास दुबार पेरणीचे संकट व बियाण्यांचा दुहेरी खर्च टाळण्यासाठी शेतकरी लगबगीने पेरणी करत आहेत. टेंभुर्णी शेतशिवारातील रानात शेतमजूर महिलाच्या गर्दीने शेत शिवार फुलुन गेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
काळी माय आमची देव
मृगात पेरलं ते करपून मातीत गेलं. बैलाचं कर्ज, पोरांची फी, घरचा डोलारा सगळं डोळ्यासमोर यायचं. राती झोप लागायची नाही. पण आद्राचा पाऊस आला अन् काळ्या मातीला वास सुटला. आता लेकरावानी जपून एकेक बी टाकतोय. ही काळी मायच आमची देव. तीच जगवते अन् तीच मारते. असे सांगताना संतोष सोनसाळे यांचे डोळे पाणावले.