Fatal attack on farmer
जालना, पुढारी वृत्तसेवा: बदनापूर तालुक्यातील काजळा येथे शेतकरी घनश्याम देवकाते यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपींना बदनापूर पोलिस अभय देत असल्याचा आरोप पीडित घनशाम देवकते यांनी केला आहे.
दरम्यान, 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी शेतात काम करत असताना दोन आरोपींनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात देवकते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडित शेतकरी घनश्याम देवकाते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देत आरोपींवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने गुन्हा नोंदवण्यात विलंब, जबाबात फेरफार व आरोपींना पाठीशी घातल्याचे गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. एफआयआरची प्रत अद्याप न दिल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून तपास दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवावा, अशी मागणी करण्यात आली असून न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.