Farmers prefer planting crops through token method
आन्वा, पुढारी वृत्तसेवा: खरीप हंगामात अनियमित अतिवृष्टीत झालेल्या पावसामुळे सोयाबीन आणि कापसासारख्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आता रब्बी हंगामातील हरभऱ्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. रब्बी हंगामात डॉलर हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. कारण त्याला बाजारात जास्त मागणी आणि चांगले दर मिळतात. या पिकाची लागवड फायदेशीर ठरत असल्याने अनेक शेतकरी टोकण पध्दतीने पिकांची लागवडीस प्राधान्य देत आहेत.
रब्बी हंगामात हरभरा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत असून ठिबक सिंचनाचा वापर करून आधुनिक पध्दतीने पिकांची लागवड केली जात आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची वाढती जाणीव आणि पाणी आणि ऊर्जेच्या वाढत्या किमतींमुळे मिश्र शेतीमध्ये ठिबक सिंचनाची लोकप्रियता वाढली आहे. हरभरा हे पीक राज्यात अत्यंत महत्वाचे आणि व्यापक प्रमाणावर घेतले जाणारे कडधान्य पीक आहे. यामध्ये प्रोटिनांचे प्रमाण भरपूर असून, पोषणमूल्याच्या दृष्टीने ते अत्यंत उपयुक्त आहे. हरभऱ्याचा उपयोग डाळ, फुटाणे, चण्याचे पीठ,
हरभऱ्याच्या भाजीपासून ते पशुखाद्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. भोकरदन तालुक्यातील जलसाठे १०० टक्के भरलेले असून ओलावा हरभऱ्यासाठी अनुकूल आहे. हरभऱ्याला कमी पाण्याची आवश्यकता, जोखीममुक्त आणि स्थिर पीक मानले जाते. मागील दोन हंगामात हरभऱ्याला चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे आणि सरकारी खरेदीचा आधारभाव असल्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विहीर, बोअरला चांगले पाणी आहे. रब्बीत हरभरा आणि गहू पेरणीचे नियोजन आहे. यंदा कमी बाजारभाव, घटलेल्या उताऱ्यामुळे सोयाबीन विकून पैशाची तजवीज शक्य दिसत नाही. उधार-उसनवारी करून पेरणीसाठी पैशाची जुळवाजुळव करून रब्बी पेरणी केली आहे.
ठिबक सिंचन हरभरा लागवडीसाठी फायदेशीर आहे, कारण यामुळे पाण्याची बचत होते आणि उत्पादन वाढते. हरभरा पिकाला पाण्याची गरज असताना, विशेषतः कळी व घाटे भरण्याच्या वेळी, ठिबक सिंचनाद्वारे योग्य प्रमाणात पाणी दिले जाते.-राजेंद्र तळेकर, कृषी सहायक