पिंपळगाव रेणुकाई ः भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे शेवग्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने हताश झालेल्या एका शेतकऱ्याने दोन वर्षांपासून जोपासलेल्या दोन एकर शेवग्याच्या झाडांवर कुऱ्हाड चालवली. या घटने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पिंपळगाव रेणुकाई येथील शेतकऱ्याने दोन वर्षांपूर्वी दोन एकर क्षेत्रावर शेवग्याची लागवड केली होती. चांगले उत्पन्न मिळेल या आशेने त्यांनी झाडांची निगा राखली, पाणी दिले, खते-औषधे फवारली. यंदा झाडांना भरपूर शेंगा लागल्या. मात्र बाजारात शेवग्याला अवघा 5 ते 10 रुपये किलोचा दर मिळत आहे. वाहतूक खर्च, मजुरी काढून हातात काहीच शिल्लक राहत नाही.
तोडणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याने संतापाच्या भरात संपूर्ण बागच तोडून टाकली. “दोन वर्षांची मेहनत वाया गेली. बियाणे, खते, पाणी, मजुरी यावर लाखभर खर्च झाला. पण भावच मिळेना. कर्ज कसं फेडायचं? म्हणून नाईलाजाने झाडे तोडली,” अशी व्यथा शेतकऱ्याने मांडली.
शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शासनाने शेवग्यासह इतर भाजीपाला पिकांना आधारभूत किंमत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतातील शेवग्याच्या झाडांना दोन वर्षांपासून जोपासले होते. सध्या बाजारात शेवग्याला मात्र कवडीमोल भाव असल्याने मजुरी निघत नाही. त्यामुळे मी शेतातील दोन एकर लागवड केलेली झाडे तोडून टाकली आहे.प्रदीप रावसाहेब देशमुख, शेतकरी