Farmer cheated by luring him with loans
जालना, पुढारी वृत्तसेवा : भोकरदन तालुक्यातील चिंचोली परिसरातील शेतकऱ्यांना शेळीपालनासाठी ५० लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका भामट्याने सुमारे साडेतीन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ज्ञानेश्वर पवार (रा. बदनापूर) असे फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे. याबाबत पाच शेतकऱ्यांनी १३ एप्रिल रोजी जालना पोलिस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली आहे.
ज्ञानेश्वर पवार याने शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० लाखांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत प्रत्येकी सुमारे ७० हजार रुपये उकळले. काही शेतकऱ्यांकडून रोख रक्कम तर काहींकडून ऑनलाइन पद्धतीने पैसे घेतल्याचा आरोप आहे. गेल्या तीन वर्षांपासून कर्ज लवकर मिळवून देण्याचे आश्वासन देत वारंवार पैसे घेतले; मात्र प्रत्यक्षात कोणालाही कर्ज मिळाले नाही.
शेतकऱ्यांनी पैसे परत मागितल्यावर पवार याने धमकाविण्याचा मार्ग अवलंबल्याचा आरोप केला आहे. 'तुमचे बाँड पेपर व धनादेश माझ्याकडे आहेत', असे सांगत शिवीगाळ केली व विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची दरम्यान, १ एप्रिल रोजी पवार याने पैसे परत देण्यासाठी बदनापूर येथे बोलावले होते. मात्र, स्वतः न येता त्याने मुलाला पाठवून सुमारे तीन लाख रुपयांचा धनादेश दिला. संबंधित बँक खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश वटला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदार शेतकऱ्यांनी केली आहे. निवेदनावर विष्णू शेळके, मधुकर शेजूळ, अंकुश बनसोडे, बालू शेळके, रामू शेळके, संतोष टोम्पे यांच्या सह्या तक्रारीत नमूद आहे.
याप्रकरणी आम्ही १५ दिवसांपूर्वी राजूर पोलिस चौक येथे सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र, उबाळे यांनी चौकशी करून तुम्हाला बोलावण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु, अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही.-विष्णू शेळके, तक्रारदार.