आन्वा ः नैसर्गिक संकटांचा वाढता मारा, शेतीमालाला मिळणारे अल्प भाव आणि वाढता उत्पादन खर्च, यामुळे शेती आधीच संकटात सापडला असताना आता शेतकऱ्यांपुढे सालगड्याच्या टंचाईचे नवे संकट उभे ठाकले आहे. शेतात काम करण्यासाठी सालगडी शोधूनही मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. एखादा गडी मिळालाच तर तो वर्षाला तब्बल एक ते दीड लाखांचे पॅकेज मागत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे.
गुढीपाडव्यापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. या काळात शेतकरी वर्षभरासाठी सालगड्याचे पॅकेज ठरवून त्याच्याशी करार करतात. मात्र, आन्वा परिसरात सालगड्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवत आहे. आता शोधूनही मिळत नसल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे सांभाळणे अवघड झाले आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून खरीप व रब्बी हंगामात अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि दुष्काळ अशा नैसर्गिक संकटांचा फटका या भागाल बसत आहे.
पेट्रोल-डिझेलची वाढ झाल्यामुळे आधुनिक शेती महागडी झालेली आहे. आता पारंपारिक शेतकरी वळावे लागेल. पिकांच्या उत्पादनात घट झाली असून, बाजारपेठेतही समाधानकारक भाव मिळत नाहीत. परिणामी, लागवड खर्चही वसूल होत नसल्याने शेती तोट्याची ठरत आहे. अपुऱ्या पावसामुळे परिसरातील बागायती क्षेत्र कोरडवाहू झाले आहे. त्यामुळे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना सालगडी ठेवणेही दिवसेंदिवस कठीण होत आहे.
नैसर्गिक संकटांचा सामना करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पिकांचे उत्पादन घटत आहे, तर बाजारपेठेत भावही मिळत नाहीत. अशा परिस्थितीत शेती कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अलीकडच्या काळात शासनाच्या वतीने अनुदानित योजना राबविण्यात येत आहेत. त्यामुळे कामाची कुणालाच गरज उरली नाही. शेतात काम करण्यासाठी मजूर आवश्यक असले तरी शेतकऱ्यांवर शोधाशोध करण्याची वेळ येत आहे. मजूर मिळत नसल्याने मजुरीही वाढवून द्यावी लागत असल्याने शेतकरी संकटात आहे.विनोद नाना देशमुख, शेतकरी आन्वा
यंदा तर खरीप व रब्बी हंगामातून शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. तसेच शेतमालाला सुद्धा योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतीत काम करण्यास कोणी तयार होत नसल्यामुळे शेतकरी सालगडी शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.अशोकराव देशमुख, शेतकरी आन्वा
अपुऱ्या पावसामुळे या परिसरात बागायती क्षेत्राचे कोरडवाहू क्षेत्र झाल्यामुळे शेतकऱ्यांना सालगडी ठेवणेही कठीण झाले आहे. त्यात खते व बियाणाचा खर्च वाढत चालला आहे. त्यातही घरचे मुले शेती कसण्यासाठी पुढे येत नाहीत. यामुळे येणाऱ्या काळात शेती कशी करावी, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.काशिनाथ सिरसाठ, शेतकरी वाकडी