आन्वा ः उन्हाळा सुरू झाला असून, तापमानाचा पारा वाढत आहे. तसतशी जारच्या शुद्ध पाण्याला नागरिकांची पसंती अधिक वाढत आहे. दरम्यान पूर्वी फक्त उन्हाळ्यातच शीतपेय विकल्या जायची. मात्र आता वर्षभरही शीतपेय, आईस्क्रीम, पाणी विकल्या जाते. यात विकल्या जाणाऱ्या शीतपेयावर कूलिंग चार्जेसच्या नावाखाली पाच रुपये अतिरिक्त आकारले जात आहे.
बदलत्या परिस्थितीनुसार शीतपेयाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. खेड्यापाड्यापर्यंत वाहनांद्वारे शीतपेयाचा पुरवठा केला जातो. विविध कंपन्यांच्या शीतपेयाच्या एजन्सीज स्थानिक परिसरात तयार झाले असल्याने पुरवठा केल्या जात आहे. कोल्ड्रिकच्या लहान बॉटलची किंमत वीस रुपये आहे. शीतपेयाची किंमत शीतपेयाच्या बॉटलवर मुद्रित असते.
असे असले तरी कूलिंग चार्जेसच्या नावावर पाच रुपये अतिरिक्त आकारल्या जात आहे. कूलिंग चार्जेसचा मुद्दा कमिशनमधून निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. शीतपेय तयार करणाऱ्या कंपन्या शीतपेय विक्रेत्यांना कमिशन कमी देतात.
शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत शीतपेय ही वस्तू गरजेची झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मागणी होते. विजेचे बिलसुद्धा मोठ्या प्रमाणात येते.यामुळे कूलिंग चार्जेस घेण्याशिवाय पर्याय नाही असा युक्तिवाद शीतपेय विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.
शीतपेय, थंडपाणी विक्री व्यवसायावर दराबाबत प्रशासनाचे फारसे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. अन्न प्रशासन गुणवत्ता तपासते, मात्र दराबाबत संबंधित विभाग लक्ष देत नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
ग्रामीण भागात अधिक लूट
शीतपेयाची विक्री किराणा दुकानापासून तर लहान मोठ्या दुकानांमध्ये केली जाते. यामुळे या विक्रीवर नियंत्रण ठेवणेसुद्धा कठीण आहे. थंड पाणी व शीतपेय विक्रीच्या व्यवसायात ग्रामीण भागात अधिक पैसे उकडले जात आहेत. गल्लीबोळातील दुकाने सहजपणे एखादा लहान फ्रीज आणून शीतपेय विकू शकतात. कूलिंग चार्जेसच्या नावावर ग्राहकांना होत असलेला अतिरिक्त भुर्दंड थांबविणे सध्या तरी कठीण दिसत आहे.