पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील निसर्गसौंदर्याने नटलेला धावडा परिसर आणि जामनेर-खान्देशच्या सीमेवरील गोद्री वनपरिक्षेत्र हे आता पर्यटकांसाठी नवीन आकर्षण बनत आहे. येथील डोंगररांगा, घनदाट हिरवी वनराई आणि पावसाळ्यात कोसळणारा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवागार झाला आहे. डोंगरावरून कोसळणारा धबधबा आणि आजूबाजूचे निसर्गरम्य दृश्य पर्यटकांना भुरळ पाडत आहे. हा धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने वाहत असून, फोटोग्राफीसाठीही उत्तम ठिकाण आहे.
हा परिसर भोकरदन तालुक्याचा "उत्तर कोकण" म्हणून ओळखला जातो. वनविभागाच्या गोद्री वनपरिक्षेत्रात येणारा हा भाग विकसित झाल्यास येथे पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते. यामुळे या भागाचा विकास करण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाने येथे रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय आणि सुरक्षा व्यवस्था केल्यास हा परिसर जालना जिल्ह्याचे एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येऊ शकते. संपूर्ण डोंगररांग परिसराचे नियोजनबद्ध डेव्हलपमेंट केल्यास येथे राज्यभरातील पर्यटक येतील. त्यामुळे हॉटेल, खाद्यपदार्थ, गाईड यासारख्या व्यवसायांमुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल.कृष्णा जंजाळ, पर्यटक भायडी