जालना ः जालना शहरात वाढती अस्वच्छता, तुंबलेले नाले आणि मोकाट तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे नागरिकांचे जगणे असुरक्षित झाले आहे. या गंभीर प्रश्नांवर काँग्रेस पक्षाने जालना महानगरपालिकेविरोधात आक्रमक भूमिका घेत महापालीकेला निवेदन दिले.
निवेदनात म्हंटले आहे की, जालना शहर कचऱ्याच्या विळख्यात अडकले असून रस्त्यांवर पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. संग्राम नगर, कन्हैया नगर, लालबाग, इंडियन नगर, नॅशनल नगर, चंदनझिरा, साठे नगर तसेच जुना जालना भागात नाल्यांमध्ये गाळ, कचरा आणि सांडपाणी साचल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे.
पावसाळा तोंडावर असतानाही नालेसफाईकडे दुर्लक्ष झाल्याने डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथीच्या रोगांचा धोका वाढल्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. शहरात नुकत्याच एका पिसाळलेल्या कुत्र्याने जुना जालना भागात धुमाकूळ घालत लहान मुलांसह आठ नागरिकांना घेतला. या प्रकारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलनाचा इशारा
प्रशासन जागे झाले नाही तर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, नगरसेवक अमजद पठाण, नगरसेवक आसिफ अन्सारी, दिनेश सुराणा, रघुवीर गुडे, सुरज येलगंटीवार, चंद्रकांत रत्नपारखे, नाना शेवाळे, दिग्विजय दांडगे, वसीम कादरी, भरत लोढा, अंकुश शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.