Chasing criminals by placing a vehicle on a raft
जाफराबाद, पुढारी वृत्तसेवा: जाफराबाद तालुक्यातील वरुड ते डोलखेडा बुद्रुक या विदर्भ-मराठवाडा सीमेवरील भागात गुन्हेगारांचा पाठलाग करताना टेंभुर्णी पोलिसांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे. नदीवर पूल नसल्याने कारवाईसाठी पोलिसांना गुन्हेगारांचा पाठलाग करताना चक्क चारचाकी वाहन तात्पुरत्या नेऊन नदी पार करण्याची वेळ येत आहे.
टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अविनाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली बीट जमादार बाबासाहेब खार्डे व पोलिस पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर संबंधित भागात कारवाईसाठी रवाना व्हावे लागले. मात्र नदीवर पूल नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान नदी ओलांडण्याचे अव्हान असते. स्थानिकांच्या मदतीने दोरीच्या साहाय्याने तयार केलेल्या तराफ्यावरून नुकतेच पोलिसांचे वाहन नदीपलीकडे नेउन गुन्हेगाराचा पाठलाग करावा लागला.
वरुड ते डोलखेडा बुद्रुक या भागात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळत असून, पोलिसांची कारवाई सुरू होताच संशयित नदीपात्राचा फायदा घेत पसार होत असल्याचे सांगितले जाते. अशा वेळी पोलिसांना अधिकृत रस्ता किंवा पूल उपलब्ध नसल्याने तात्पुरत्या तराफ्यावरून वाहन व कर्मचारी नदीपार करण्याची कसरत करावी लागते.
पोलिसांचे वाहन तराफ्यावर उमे करून दोरीच्या साहाय्याने नदीपार करण्याचा हा प्रकार अत्यंत धोकादायक आहे. पाण्याचा प्रवाह, तराफ्याचा असमतोल किंवा दोरी तुटल्यास वाहनासह पोलिस कर्मचारी नदीत पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी कर्तव्य बजावणे आवश्यक असले, तरी त्यासाठी पोलिसांचे जीव धोक्यात घालणे कितपत योग्य, असा प्रश्न आहे.
जबाबदार कोण
थर्माकोलच्या तराफ्यावर पोलिसांचे वाहन आणि कर्मचारी नदीपार नेणे हा अत्यंत धोकादायक प्रकार आहे. दुर्दैवाने काही दुर्घटना घडली असती तर त्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल सुजाण नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.