Campaign for electricity bill collection
जालना : पुढारी वृत्तसेवा : जालना जिल्ह्यात महावितरणच्या थकीत वीज बीलात वाढ होत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे टेंन्शन वाढले आहे. जिल्ह्यातील घरगुती, औद्योगीक, व्यावसायीक अशा १ लाख ग्राहकांकडे जवळपास शंभर कोटीच्यावर वीज बीलाची बाकी आहे. थकीत वीज बीलाची जास्तीत जास्त बाकी मार्च एण्डपर्यंत वसुलीचे उद्दीष्ठ महावितरणने डोळ्या समोर ठेवले आहे.
जालना जिल्ह्यात विज ग्राहकाकडे वाढत असलेल्या थकीत वीज बीलामुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. वीज बील वसुलीसाठी ग्राहकांना सुचना देउन थकीत वीज बील न भरल्यास ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई प्रसंगी केली जात आहे. जानेवारी महिन्यात वीज बीलाच्या थकीत बाकी असलेल्या १ हजार ६११ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरता खंडीत करण्यात आला होता.
वीज बील वसुलीसाठी महावितरणने पथके तयार केली असुन ती ग्राहकांच्या घर व प्रतिष्ठापणा पर्यंत जावुन वीज बील भरण्याची सुचना देत आहे. ग्राहकांनी वीज बिल न भरल्यास प्रसंगी त्यांचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. महावितरणसाठी थकीत विज बीलाचे ओझे जड झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभुमीवर मार्च एण्ड पर्यंत जास्तीत जास्त विज बील वसुलीचे उद्दीष्ठ डोळ्यासमोर ठेवुन अधिकारी व कर्मचारी कामाला लागल्याचे दिसत आहे.
वीज बीलाची थकबाकी असलेल्या अनेक ग्राहकांनी महावितरणकडे गेल्या काही महिन्यात एकही रुपया भरला नसल्याचे ऐकावयास मिळत आहे. वीज वसुली करतांना काही संवेदनशिल भागात अधिकारी व कर्मचाऱ्यांना विरोध होण्याची शक्यता लक्षात घेउन अशा भागात पोलिस बंदोबस्तात कारवाई करण्यात येणार आहे.
थकबाकीदारांना वीज देणे पडणार महागात
ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे त्या ग्राहकांना शेजाऱ्यांनी वीज पुरवठा केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येउ शकते अशी माहीती सुत्रांनी दिली.