Bribery cases not stop; ACB 409 traps
संघपाल वाहूळकर
जालना : अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये कुठलेही शासकीय काम करायचे असेल तर लाच घेतल्याशिवाय काम होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यभरात दर दिवसाला दोन सापळे पडत असल्याचे आकडेवारीने दिसून येत आहे. १ जानेवारी ते २४ जुलै या सहा महिन्यांपर्यंत राज्यभरात ४०९ सापळे लावण्यात आले आहेत. ४ अपसंपदा तर २ अन्य भ्रष्टाचार असे एकूण ४१५ गुन्हे दाखल झाले आहेत.
दरम्यान, सरकारी काम आणि सहा महिने थांब या वृत्तीतून लाचखोरी बळावल्याचे दिसून येते. पैसे दिले तर लवकर काम होते, ही वृत्तीही सर्वसामान्यांची घातक ठरत आहे. तर अधिकारी, कर्मचाऱ्यांना ती पूरक ठरत आहे. कुठलेही शासकीय काम करायचे असेल तर लाच घेतल्याशिवाय काम होत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला आळा घालण्यासाठी एसीबी विभागदेखील सक्रिय असून ट्रॅपसुद्धा वाढले आहे. १ जानेवारी ते २४ जुलै या सहा महिन्यांमध्ये ४०९ ट्रॅप म्हणजेच दरदिवसाला राज्यात दोन ते तीन जण एसीबीच्या जाळ्यात अडकत आहेत.
सहा महिन्यांमध्ये राज्यात आठही विभागांत ४०९ ट्रॅप एसीबीने यशस्वी केले. म्हणजे प्रत्येक महिन्याला ७४ ट्रॅप राज्यात झाले आहे. दर दिवसाला २ ते तीन ट्रॅप यशस्वी होत आहेत. त्याकारणाने लाचख-रांचे धाबे दणाणले आहे. यात याहीवर्षी लाच खाण्यात महसूल विभाग अव्वल स्थानी असून, सर्वाधिक ११३ ट्रॅप याच विभागातील आहेत.
दुसरा क्रमांक हा पोलिस विभागाचा लागतो. या विभागात ६४ सापळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी केले, तर पंचायत समितीमध्ये ४१, वीज कंपनी ३०, महापालिका १७, शिक्षण विभाग १९, वनविभाग १४, सहकार व पणन विभाग ११, जिल्हा परिषद १७, आरोग्य विभाग १२, कृषी विभाग ६, जलसंपदा विभाग १, विक्रीकर विभाग २, सार्वजनिक बांधकाम विभाग ६, आदिवासी विकास ३ व इतर अनेक विभागांचा यामध्ये समावेश आहे.
तृतीय श्रेणीचे सर्वाधिक कर्मचारी या सहा महिन्यांत रचलेल्या सापळ्यात अडकले आहे. सुमारे २८१ कर्मचारी यात अडकल्या दिसून येते. वर्ग १ चे ४८, वर्ग २ चे ७४ अधिकारी व वर्ग तीनचे २८१ अधिकारी कर्मचारी अडकले आहेत. वर्ग ४ चे सर्वात कमी २१ कर्मचारी लाचखोरीत अडकले आहेत. सापळा कारवाईक नाशिक विभाग पहिल्या क्रमांकावर आहे.
एसीबीने केलेल्या लाचखोरीच्या कारवाईत सर्वाधिक ११३ ट्रॅप नाशिक विभागात यशस्वी झाले आहेत. त्यानंतर पुणे विभाग ७३, ठाणे ५४, नागपूर ३८, अमरावती ४१, छत्रपती संभाजीनगर ६९, व नांदेड विभागात ३२ ट्रॅप यशस्वी झाले आहेत. या व्यतिरिक्त ४ अपसंपदाच्या प्रकरणाचाही यामध्ये समावेश आहे.