वडीगोद्री : राज्य सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांचा देखील बोलबाला सुरु झाला आहे. सरकारने मोठ्या माणसांसाठी पगार सुरू केला, मग आम्ही बारक्यांनी सरकारचं काय घोडं मारलं आहे. आम्हा बारक्या पोरांसाठी सरकारने बारकं लेकरू योजना आणावी, अशी मागणी कार्तिक वजीर (भोऱ्या) या जिल्हा परिषदेच्या शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने भाषणातून केली आहे.
कार्तिकचे याआधी अनेक भाषणाचे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. त्याच्या लोकशाहीवरील भाषणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही भुरळ घातली होती. आज त्याने तो शिकत असलेल्या अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत दमदार भाषण केले. लहान मुलांसाठी बारकं लेकरु योजना आणण्याची मागणी त्याने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सरकारने फुकट पैसे वाटने बंद करावे, नाहीतर देश आळशी होऊन परत गुलामगिरीत जाईल, असे कार्तिकने आपल्या भाषणात म्हटले आहे. कष्ट करा शहाणे व्हा, आई-वडिलांच्या प्रेमाशिवाय काहीही फुकट मिळत नाही, असा कार्तिकने नागरीकांना सल्ला दिला.