पिंपळगाव रेणुकाई : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाईसह परिसरात मंगळवारी (दि.२१) दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. सकाळपासून सुरू झालेल्या पाऊस रात्री उशिरापर्यत सुरू होता. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने करपणाऱ्या पिकांना या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. सकाळी झालेल्या या पावसामुळे सोयाबीन, कपाशी, मका, तूर आणि उडीद या खरीप पिकांना थोड्याफार प्रमाणात का होईना जीवदान मिळाले आहे.
विशेषतः मका पिकाची वाढ खुंटली होती. जमिनीला ओलावा मिळाल्याने पिके पुन्हा टवटवीत होण्यास मदत झाली आहे.गेल्या आठवड्यापासून शेतकरी स्पिंकलर साह्याने विहिरीतील साठवलेल्या पाण्यावर पिके जगवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पाणी टंचाईमुळे हा प्रयत्न अपुरा पडत होता. आजच्या अल्पशा पावसाने शेतकऱ्यांच्या त्या चिंतेत काहीशी घट झाली आहे.अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
"पाऊस झाला हे बरे झाले, पण हे फक्त तोंडाला पाणी पुसल्यासारखे आहे. पिके जगवण्यासाठी अजून चांगला पाऊस हवा आहे, जमिनीतील ओलावा टिकण्यासाठी सलग दोन-तीन दिवस चांगला पाऊस झाल्यास सोयाबीन आणि कापसाची वाढ होईल. अशी अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना आजच्या पावसाने थोडीशी आशा मिळाली आहे. मात्र हाताशी आले पीक वाचवण्यासाठी येत्या आठवड्यात समाधानकारक पाऊस होणे आवश्यक आहे. पाऊस न झाल्यास पुन्हा एकदा पिके संकटात सापडतील, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.