पिंपळगाव रेणुकाई, पुढारी वृत्तसेवाः भोकरदन तालुक्यातील वरुड बु परिसरात अत्यंत धक्कादायक आणि मानवतेला काळिमा फासणारा प्रकार समोर येत आहे. स्मशान भुमीत मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर रात्रीच्या अंधारात अज्ञात समाजकंटक स्मशानभूमीत जाऊन मयत व्यक्तीच्या चितेवरील राख पोत्यात भरून घेऊन जात असल्याच्या घटना घडत आहे. राखेत राहिलेले सोन्याचे दागिने, अंगठ्या, मंगळसूत्रातील सोन्याचे अंश किंवा इतर मौल्यवान धातू मिळविण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला जात असल्याची चर्चा आहे. मयताच्या नागरिकांमध्ये या प्रकारामुळे तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
वरूड बु. येथे एका व्यक्तीचे निधन झाल्यानंतर नातेवाईकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यामनंतर तिसऱ्या दिवशी नातेवाईक व कुटुंबीय धार्मिक परंपरेनुसार अस्थी संकलनासाठी स्मशानभूमीत गेले. मात्र त्या ठिकाणी चितेवरील संपुर्ण राख गायब झाल्याचे दिसून आले. यामुळे नातेवाईकांना मानसिक धक्का बसला. प्रिय व्यक्तीच्या अस्थी गोळा करण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांना त्यामुळे रिकाम्या हाती परतावे लागले. दरम्यान हा प्रकार केवळ राख चोरीचा नसून मृत व्यक्तीच्या स्मृतीचा, धार्मिक श्रद्धेचा आणि कुटुंबाच्या भावनांचा घोर अपमान असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून अशा घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत कोणीही नसल्याचा फायदा घेत समाजकंटक चितेवरील संपूर्ण राख पोत्यामध्ये भरून घेऊन जातात. त्यानंतर त्या राखेतून सोन्याचे कण किंवा वितळलेले दागिने शोधले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
काही ठिकाणी राख विखुरलेली किंवा पूर्णपणे गायब
झाल्याचेही आढळून आले आहे. यापुर्वी पिंपळगाव रेणुकाई येथे देखील असा प्रकार उघडकीस आला होता. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांनीही या प्रकाराचा तीव्र निषेध करत, अशा विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींना तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे. मृत व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतरही कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी दुःखाच्या क्षणीही मानवता विसरणाऱ्या अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई होणे ही काळाची गरज असून, मृत व्यक्तीच्या अस्थी आणि श्रद्धेचा अवमान करणाऱ्या या अमानुष प्रकाराला वेळीच आळा घालण्याची मागणी पिंपळगाव रेणुकाई परिसरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
दागिण्यांच्या हव्यासापोटी समाजातील अज्ञात आणि विकृतीचा कळस गाठलेल्यी हैवानी प्रवृत्तीचे लोक रात्रीच्या वेळेस संपूर्ण' रक्षा' आणि ' अस्ती' गोळा करून नेत आहेत. हा किळसवाणा प्रकार कुटूंबाच्या भावनांचा आणि श्रद्धेचा चुराडा करणारा अघोरी प्रकार आहे. या बाबीकडे समाजातील सर्व घटकांनी या पुढे सजग राहून आपल्या प्रियजनांची रक्षा अथवा अस्ती कोणी नेवू नये यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- डॉ देविदास पाटील वाघ, वरुड बु