'Amrutvan' to be freed from garbage depot
जालना, पुढारी वृत्तसेवा: शहरातील नागरिकांसाठी ओपन जीम, जॉगिंग ट्रॅक अशी सुविधा असलेल्या अमृतवनाशेजारी कचरा संकलन केंद्र उभारण्यात आल्याने या अमृतवनाला अवकळा आली होती. ऐन दारासमोरच कचरा साचत असल्याने अमृतवन विष वन बनले होते. अखेर महानगरपालिकेने याची दखल घेत येथील कचरा संकलन केंद्र हटविण्याचा निर्णय केला आहे.
तशी मंजूरी मंगळवार, दि. १५ रोजी पार पडलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आली. दरम्यान, जालना शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असलेले आणि विरंगुळा व्हावा, यासाठी मोती तलावाशेजारी अमृतवनाची उभारणी करण्यात आली. येथे विविध प्रजातींची झाडे लावण्यात आली.
ती झाडे आता मोठी झाली असून, एका प्रकारचे ऑक्सिजन पार्क बनत चालले आहे. मात्र, महापालिकेने अमृतवनाच्या दारापाशीच कचरासंकलन केंद्र बनवल्याने दुर्गंधी पसरत होती. परिणामी, या भागात नागरिक जॉगिंग, फिरण्यासाठी येत नव्हते. ही अडचण आणि सदस्यांची मागणी लक्षात घेता कचरा संकलन केंद्र हटविण्यात येणार आहे.
यासाठी महानगरपालिका प्रशासनाने दोन जागा निश्चित केल्या आहेत. गांधी नगर येथे असलेले जुने डंपिंग ग्राउंड येथे कचरा संकलन करून सामनगाव येथे मोठ्या वाहनांतून कचरा नेला जाणार आहे. शिवाय, सर्वे क्रमांक ४८८ मध्ये कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव तहसील कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. त्यास मान्यतादेखील मिळाली आहे. लवकर मनपाच्या ताब्यात येईल, अशी माहिती कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर यांनी दिली.
कचरा टाकणाऱ्यांवर होणार कारवाई
शहरातील नागरिकांकडून कचरा टाकण्यात येणारे २० ठिकाणं महापालिका प्रशासनाने निश्चित केली आहे. यापुढे या भागात कचरा कोणी टाकला तर त्यावर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त अंजली शर्मा यांनी दिली. दरम्यान, अमृतवन शेजारी असलेला सर्व कचरा काढून टाकण्यात येणार आहे. कचरा संकलनासाठी जालना आणि जुना जालना असे दोन विभाग करण्यात आले आहे. शहरातील कचरा याठिकाणी संकलित केला जाणार असून, त्यानंतर सामनगाव येथील प्रकल्पावर नेला जाणार आहे. कचरा संकलन करत असलेल्या प्रत्येक घंटागाडीवर जीपीएस यंत्रणा बसवली जाणार आहे. त्यासाठी वॉररुम तयार करण्यात येणार आहे.