जालना : महावितरणने विशेष मोहीम राबवून अंबड तालुक्यातील विविध गावांतील तब्बल 62 ग्राहकांवर पोलिसांत वीजचोरीचा गुन्हा दाखल केला. यामुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने, छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली व जालना मंडलाचे अधीक्षक अभियंता संजय सरग यांच्या नेतृत्वाखाली अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांबरोबरच मानव संसाधन व लेखा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली.
ही पथके ग्राहकांना अचानक भेट देऊन तपासणी करत आहेत. जिल्हाभर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील वडीगोद्री शाखेअंतर्गत विविध गावांत सहायक अभियंता राजेश गिरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोहीम राबवली असता तब्बल 62 ग्राहक हे वीजचोरी करत असल्याचे आढळले.
घरगुती ग्राहकांसोबतच हायवेवरचे हॉटेल, ढाबे, वीटभट्ट्या असे व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकही वीजचोरी करताना सापडले. या ग्राहकांकडे 19 लाख 51 हजार 265 रुपये एवढी वीजबिल थकबाकी आहे. वारंवार सांगूनही त्यांनी बिल भरण्यास प्रतिसाद न दिल्याने काही महिन्यांपूर्वी त्यांचे मीटर काढून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. मात्र त्यानंतरही त्यांनी 60 हजार 801 युनिट वीजचोरी केली.
या वीजचोरीची रक्कम तब्बल 10 लाख 15 हजार 200 रुपये एवढी होते. वीजबिलाची जवळपास 20 लाखांची थकबाकी व 10 लाखांची वीजचोरी असे महावितरणचे सुमारे 30 लाख रुपयांचे नुकसान या ग्राहकांनी केले आहे. महावितरणने 11 व 15 एप्रिल रोजी 62 जणांवर परतूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.