All soil and water conservation works in the district should be completed on time: Minister Sanjay Rathod
जालना, पुढारी वृत्तसेवा : मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात सुरू असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात मृद व जलसंधारण विभागाशी संबंधित विविध विषयांचा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे, आमदार हिकमत उढाण, आमदार संतोष दानवे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे, मनीषा देशपांडे, मृद व जलसंधारण विभागाचे ओएसडी अनंत जगताप आणि देवेंद्र भामरे, मुख्य अभियंता हरिभाऊ गिते, अधीक्षक अभियंता अजितकुमार परांडे, कार्यकारी अभियंता नरेंद्र कटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, वरिष्ठ भूवैज्ञानिक सी. एच. गिरीधर यांची उपस्थिती होती.
यावेळी मंत्री श्री. राठोड म्हणाले की, जिल्ह्यातील पाझर तलाव दुरुस्ती, जलसंधारणाच्या जुन्या कामांची दुरुस्ती आणि नवीन कामांचा प्रस्ताव मृद व जलसंधारण विभागाने तयार करावा. भूसंपादनामुळे रखडलेल्या मृद व जलसंधारण विभागाच्या प्रकल्पांचा आढावा घेताना आवश्यकतेनुसार भूसंपादनासाठी निधी वितरित करावा. घनसावंगी तालुक्यातील जांब तांडा साठवण तलाव या प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करून त्यात निर्णय घेऊन प्रस्ताव सादर करावा. तसेच जालना जिल्ह्यात मृद व जलसंधारण विभागातील अभियंता यांची रिक्त पदे भरण्याची कारवाई लवकर करणार असल्याचेही ते म्हणाले.
अभिसरणाची प्रस्तावित कामे पूर्ण करा
एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत विशेष निधी व अभिसरणाची प्रस्तावित कामे तत्काळ पूर्ण करावीत. मागील वर्षात अतिवृष्टीने क्षतीग्रस्त झालेल्या योजनाची कामे पूर्ण करावी. जिल्हाधिकारी यांनी दर महिन्याला मृद व जलसंधारण विभागाच्या कामाचा आढावा घ्यावा. तसेच सर्व संबंधित विभागांनी जलतारा प्रकल्प राबविण्याला प्राधान्य द्यावे.