जालना : जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या अनुदानात मोठा घोटाळा झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील फरार आरोपी तलाठी चंद्रकांत तुकाराम खिल्लारे याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 7 मार्च 2026 पर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर शासनाने चार जीआर काढून बाधित शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केले होते. मात्र अंबड व घनसावंगी तालुक्यातील 240 गावांमध्ये याद्या अपलोड करताना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बोगस नावे समाविष्ट केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या नावांवर आलेली शासकीय अनुदानाची रक्कम परस्पर परत घेतल्याचा आरोप आहे.
तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठीत केली होती. समितीच्या अहवालानुसार सुमारे 24 कोटी 90 लाख 77 हजार 811 रुपयांचा शासकीय निधी अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे.
38 जण अटकेत
या गुन्ह्यात यापूर्वी 37 आरोपींना अटक करण्यात आली. आजपर्यंत 22 तलाठी, 1 कृषी सहायक, 3 सहायक महसूल अधिकारी, 3 कोतवाल, 2 ऑपरेटर व काही एजंट अशा एकूण 38 जणांना अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.