A gathering of devotees of Lord Hari at Anva, the 'Prati-Pandharpur' (replica of Pandharpur)
भोकरदन, पुढारी वृत्तसेवाः पंढरीची वारी आहे माझे घरी। आणिक न करी तीर्थव्रत ॥ या संतवचनाचा प्रत्यय देणारी, सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्षांची अखंड, प्रासादिक आणि भक्तिपूर्ण परंपरा आजही मराठवाड्यातील श्रीक्षेत्र अनवा येथे अविरत सुरू आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात वसलेले श्रीक्षेत्र अनवा हे भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून, 'मराठवाड्याची पंढरी' म्हणून ओळखले जाते.
इसवी सन १६३० मध्ये संत सद्गुरू श्रीविठोबा दादामहाराज चातुर्मास्ये यांनी श्रीक्षेत्र अनवा येथे भगवान श्री पांडुरंग परमात्मा व आईसाहेब रुक्मिणी मातेची स्थापना केली. तेव्हापासून आजतागायत श्रीक्षेत्र अनवा येथे विठ्ठल-रुक्मिणी भक्तीची अखंड ज्योत तेवत आहे. संत सद्गुरू श्रीविठोबा दादामहाराज चातुर्मास्ये यांच्या या पुरातन वारकरी पीठाची परंपरा केवळ एका गावापुरती मर्यादित राहिलेली नाही.
मराठवाडा, खानदेश, मध्य प्रदेश तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील असंख्य भाविक या परंपरेशी श्रद्धेने जोडलेले आहेत. अंधश्रद्धा, जादूटोणा यांसारख्या गोष्टींना या परंपरेत कोणतेही स्थान नाही. लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता सर्वांना भक्तीच्या मार्गावर समान स्थान दिले जाते.
श्री संस्थानच्या वतीने आषाढी एकादशीच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पहाटे अभिषेक व आरती, दुपारी प्रवचन, सायंकाळी दिंडी सोहळा, नगरप्रदक्षिणा, हरिपाठ आणि रात्री हरिकीर्तन अशा भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशीचा सोहळा साजरा होतो. श्रीक्षेत्र अनवा येथे येणारा प्रत्येक भाविक जणू पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाचा अनुभव घेतो. म्हणूनच श्रीक्षेत्र अनवा हे भाविकांसाठी केवळ एक तीर्थक्षेत्र नसून, 'मराठवाड्याची पंढरी' आहे.
विठ्ठल नामाचा गजर, भक्तीची अखंड ज्योत
विठ्ठल नामाचा गजर, संतपरंपरेचा आधार आणि भक्तीची अखंड ज्योत अशी श्रीक्षेत्र अनवा येथील ही परंपरा आजही महाराष्ट्राच्या संतभूमीत भक्तीचा प्रकाश पसरवत आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या दिशेने निघणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या पावलांबरोबरच, मराठवाड्याच्या या पवित्र भूमीतही विठ्ठलनामाचा जयघोष दुमदुमतो. म्हणूनच श्रीक्षेत्र अनवा म्हणजे केवळ एक तीर्थक्षेत्र नव्हे; तर संतपरंपरेने, नामस्मरणाने आणि अखंड विठ्ठलभक्तीने पावन झालेली मराठवाड्याची पंढरी !