44 murders were reported in Jalna district in the past year.
जालना, पुढारी वृत्तसेवा : सरते वर्ष जालना जिल्ह्यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक ठरले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ४४ खुनांच्या गंभीर घटना घडल्या असून, या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. खून, दरोडे, लूटमार, घरफोड्या, चोरी, अवैध शस्त्रसाठा आणि विक्री यांसारख्या गुन्ह्यांनी वर्षभर जालना जिल्हा गाजला.
जालना जिल्ह्यात यापूर्वीही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना अपेक्षित यश मिळालेले नाही. विशेषतः जालना शहरात मागील काही वर्षांपासून खुलेआम गुन्हेगारी कृत्ये वाढताना दिसत आहेत. वर्ष २०२४ मध्ये याच कालावधीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गजानन तौर याची मंठा चौफुली येथे भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
त्यानंतर उजाडलेले २०२५ हे वर्षही खुनाच्या घटनांनीच चर्चेत राहिले. पोलिसांकडे दाखल गुन्ह्यांनुसार दर महिन्याला सरासरी तीन ते चार खुनाच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. नुकत्याच झालेल्या एका घटनेत पैशाच्या व्यवहारातून सागर धानुरे याचा गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून पहाटेच्या सुमारास खून करण्यात आला. या प्रकरणातील संशयित आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक केली असली, तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फोफावलेली अवैध शस्त्रांची तस्करी हे पोलिस प्रशासनाचे अपयश अधोरेखित करणारे आहे.
वर्षभरात जिल्ह्यात सुमारे २०० घरफोड्या व दरोड्यांच्या घटना, तर दुचाकी व चारचाकी वाहन चोरीच्या जवळपास ४०० घटना घडल्या आहेत. चोरट्यांनी शेतकऱ्यांचे पशुधन लक्ष्य करत ६० पशुधन चोरीच्या घटना, तसेच ९० हून अधिक शेती साहित्य चोरीचे प्रकार केले आहेत. याशिवाय वर्षभरात ४०० पेक्षा अधिक विवाहित महिलांवरील कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत.
एकंदरीत वाढत्या गुन्हेगारीमुळे जिल्ह्यात पोलिसांचा वचक कमी झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून, कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अवैध शस्त्रांची विक्री
जालना जिल्ह्यात अवैधरित्या शस्त्रे बाळगणे, त्यांचा सार्वजनिक ठिकाणी वापर करून दहशत निर्माण करणे, तलवारी, चाकू, सुरे, गुप्ती, पिस्तूल यांची सर्रास विक्री व वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, जालना शहरात भारतीय डाक विभागाच्या पार्सलमधून अवैध तलवारी मागवण्यात आल्याच्या आठ ते दहा घटना उघडकीस आल्या आहेत. तसेच गावठी पिस्तुलांची मोठ्या प्रमाणावर तस्करी सुरू असल्याचे चित्र आहे.
गुटखाविक्रीचा कळस
राज्यात बंदी असलेल्या गुटख्याचे मुख्य केंद्र जालना जिल्हा बनल्याचे चित्र आहे. शहरात दररोज कोट्यवधी रुपयांचा अवैध गुटखा आणला, विकला आणि वाहतूक केला जात आहे. काही गुटखा माफियांवर गंभीर गुन्हे दाखल असतानाही मुख्य सूत्रधार पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.