

Financial burden for marriage registration
आन्वा, पुढारी वृत्तसेवा : लग्न करणे एक वेळ सोपे आहे, पण विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे तेवढेच अवघड आहे. प्रक्रियेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव आणि साक्षीदारासह सर्वांना घेऊन नोंदणी करण्याची प्रक्रिया किचकट आहे. आई-वडिलांना न सांगता घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या प्रेमीयुगुलांना एखाद्या धार्मिक ठिकाणातून सहज विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळते. मात्र, आईवडिलांच्या संमतीने लग्न करणाऱ्या जोडप्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो.
ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद येथे जन्म मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी कार्यालय आहे. येथे विवाह नोंदणी प्रमाणपत्राचा अर्ज सादर करावा लागतो, विवाह नोंदणी करण्यासाठी आता खूप कागदपत्र द्यावे लागत असून, मागील तीन महिन्यांपासून हा विवाह नोंदणीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वर वधूचे पिता या विवाह नोंदणीसाठी ग्रामीण रुग्णालयाच्या चकरा मारीत आहेत, परंतु हे काम ज्यांच्यावर सोपविले, ते काम करीत नाहीत. या विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी साक्षीदारांची जुळवाजुळव करताना नाकीनऊ येत आहेत.
जो व्यक्ती स्वतः येऊन नियमात राहन विवाह नोंदणी करण्याची प्रक्रिया करीत असेल तर त्याला विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळत नाहीं आणि दलालांच्या माध्यमातून प्रमाणपत्र बनविल्यास लवकर प्रमाणपत्र मिळते यासाठी अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागत असल्याची माहिती आहे. या सर्वबाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.
वेटिंग कमी पण त्रुट्यांचाच महापूर
गोंदिया जिल्ह्यात विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी वेटिंग कमी मात्र अर्जामध्ये तुट्याच खूप काढल्या जातात. त्या त्रुट्या पूर्ण करण्यासाठी सांगितले जाते. सुरुवातीला अर्जाचा नमुना देण्यासाठी कर्मचारी हलगर्जीपणा करतात.
नोंदणी प्रमाणपत्र कसे काढाल ?
वधू किंवा वर यापैकी एक जण गोंदिया जिल्ह्यातील असल्यास, त्याच्याकडून लग्न झाल्याच्या पुरावा सादर केल्यानंतर, ऑफलाइन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करून विवाह नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते.
नोंदणीसाठी पाचशे रुपयांचा खर्च
पाचशे रुपयांचे तीन बाँड विवाह नोंदणीसाठी पुरोहिताचे ५०० रुपयांचे शपथपत्र तसेच वधू-वरांचे प्रत्येकी ५०० रुपयांचे दोन शपथपत्र असे एकूण ३ शपथपत्र व बाँड सादर करावे लागतात. एक वर्षाच्या आत प्रमाणपत्र काढल्यास शुल्क कमी लागते. पैसेही खर्च आणि त्रासही होतो.
कोणकोणती कागदपत्रे आवश्यक
माहितीचा अर्ज, वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, ओळखपत्र, विवाह पुरावा, विवाह झाल्याचे दोन फोटो, लग्नपत्रिका, मंगल कार्यालयाचे प्रमाणपत्र, दोन्हीकडील दोन साक्षीदार, त्यांचे ओळखपत्र, त्यांचा रहिवासी पुरावा, पुरोहिताचे ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व ५०० रुपयांचा बाँड नोटरीसह आवश्यक लागते. सर्व कागदपत्रे एकत्र करून अर्ज सादर केल्यावर साक्षीदार आणि पुरोहित यांना सोबत घेऊन जन्म नोंदणी प्रमाणपत्र अधिकाऱ्यांच्या कक्षात विवाह नोंदणी अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण होते. अर्ज सादर केल्यावर शुल्क भरताच तीन दिवसांत प्रमाणपत्र दिले जाते.