1.75 lakh farmers in the district found eligible for loan waivers
जालना, पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत जालना जिल्ह्यातील ९५४ गावांमधील १ लाख ७५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जालना कार्यालयाकडून २४ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेल्या यादी मधे तालुकानिहाय आकडेवारी देण्यात आली आहे.
या योजनेतील पात्रतेसाठी अल्पमुदत कर्जाचा कालावधी १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ असा आहे. तसेच थकीत कर्जाचा विचार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत करण्यात आला आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या कर्जासाठी ३१ मार्च २०१७ पर्यंतची थकबाकी विचारात घेण्यात आली आहे. तालुकानिहाय आकडेवारीनुसार जालना तालुक्यात सर्वाधिक १६ हजार ७९० शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत.
त्यापाठोपाठ अंबडमध्ये १६ हजार ३७२, भोकरदनमध्ये १४ हजार ७८६, जाफराबादमध्ये १३ हजार २३० आणि घनसावंगीमध्ये १२ हजार ८८२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. परतूर तालुक्यात १० हजार ९१, बदनापूरमध्ये ९ हजार ५५, तर मंठा तालुक्यात ६ हजार ८६९ शेतकरी पात्र ठरले आहेत.
जिल्ह्यात शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान व आंनद दिसुन येत आहे. आकडेवारीनुसार भोकरदन तालुक्यात सर्वाधिक १५७ गावांचा, तर बदनापूर तालुक्यात सर्वात कमी ८६ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची एकूण संख्या १ लाख ७५ असल्याचे यादीत नमूद आहे.